फडणवीसांच्या शपथविधीची तांत्रिक चूक काँग्रेसने शोधली, राज्यपालांना कचाट्यात टाकणारे प्रश्न
काँग्रेसने राज्यपालांवर एकप्रकारे पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीपसिंह सूरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन, राज्यपालांना काही प्रश्न विचारले.
नवी दिल्ली : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीवरुन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर टीका होत आहे. काँग्रेसने काही प्रश्न उपस्थित करत, राज्यपालांकडे उत्तरं मागितली आहेत. शिवाय काँग्रेसने (Randeep Singh Surjewala) राज्यपालांवर एकप्रकारे पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीपसिंह सूरजेवाला (Randeep Singh Surjewala) यांनी पत्रकार परिषद घेऊन, राज्यपालांना काही प्रश्न विचारले.
रणदीपसिंह सूरजेवाला यांनी कालच्या सर्व घटनाक्रमाची माहिती मागितली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची रात्रीत बैठक कशी आणि कधी झाली इथपासून ते राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट हटवण्याचा निर्णय किती वाजता घेतला, असे प्रश्न उपस्थित करत, सूरजेवाला यांनी भाजपवर तोफ डागली.
रणदीप सूरजेवाला यांनी उपस्थित केलेले प्रश्न
- मोदी-अमित शाहजी भाजपने सरकार बनवण्याचा दावा कधी केला?
- भाजप-राष्ट्रवादीच्या किती आमदारांचं सह्यांचं पत्र मिळालं?
- राज्यपालांनी सर्व आमदारांच्या सह्यांची पडताळणी एका तासात कसं केलं?
- राज्यपालांनी केंद्र सरकारला राष्ट्रपती राजवट हटवण्याची शिफारस किती वाजता केली?
- केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक काल रात्री किती वाजता झाली? त्यामध्ये कोण कोण मंत्री होते? केंद्राने किती वाजता राष्ट्रपतींना राजवट हटवण्याची शिफारस केली?
- केंद्राची शिफारस राष्ट्रपतींना किती वाजता पाठवण्यात आली?
- राष्ट्रपतींनी केंद्राची शिफारस किती वाजता स्वीकारली?
- राज्यपालांनी कोणत्या पत्राद्वारे फडणवीस आणि अजित पवारांना शपथविधीसाठी निमंत्रण दिलं?
- शपथ किती वाजता झाली? प्रायव्हेट न्यूज एजन्सी सोडून ना सरकारी डीडी वृत्तवाहिनी किंवा कोणत्याच मीडियाला का माहिती दिली नाही?
- मुख्य न्यायाधीशांना शपथविधीला का बोलावलं नाही?
- राज्यपालांनी आतापर्यंत का सांगितलं नाही की बहुमत कधी सिद्ध करायचं आहे?
Non Stop LIVE Update