AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saamana Editorial: “शिंदे सरकारने काल गोंधळाचा ट्रेलर दाखवला, पुढे कोणता पिक्चर दाखवणार?”, सामनातून सवाल

राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्यात विधिमंडळ परिसरात बाचाबाची झाली. यावर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलंय.

Saamana Editorial: शिंदे सरकारने काल गोंधळाचा ट्रेलर दाखवला, पुढे कोणता पिक्चर दाखवणार?, सामनातून सवाल
| Updated on: Aug 25, 2022 | 7:07 AM
Share

मुंबई : काल विधिमंडळ परिसरात अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. ज्यात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्यात बाचाबाची झाली. यावर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून (Saamana Editorial) भाष्य करण्यात आलंय. “महाराष्ट्राच्या विधिमंडळाला एक समृद्ध अशी राजकीय परंपरा आहे; पण ही मौलिक परंपरा पायदळी तुडवतानाचे दृश्य बुधवारी साऱ्या जगाने बघितले. सत्तारूढ शिंदे गटाने विधिमंडळाच्या आवारात घडवलेल्या धुमश्चक्रीमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. त्यानंतरही ‘ये तो एक ट्रेलर था,’ अशी धमकी दिली जात असेल तर शिंदे गट भविष्यात महाराष्ट्राला कोणता ‘पिक्चर’ दाखवण्याच्या तयारीत आहे? अर्थात सरकारचा हा गुवाहाटीफेम सिनेमा म्हणा किंवा तमाशा, महाराष्ट्राची जनताच उद्या डब्यात घातल्याशिवाय राहणार नाही”, असं ,सामनात म्हणण्यात आलं आहे. आज पावसाळी अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Monsoon Session Mess) अखेरचा दिवस आहे. त्यामुळे आज काय होणार, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

विधिमंडळातील गोंधळावर सामनातून प्रश्नचिन्ह

विश्वासघात करून जन्माला आलेले सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आल्यापासून सनदशीर मार्गाने कारभार चालवण्यापेक्षा धमक्या व मारहाणीसारखे गुंडगिरीचे प्रकार अंमळ अधिकच वाढले आहेत. बुधवारी विधिमंडळाच्या आवारातही नेमके हेच घडले. सत्तारूढ व विरोधी आमदारांमध्ये अभूतपूर्व धुमश्चक्री झाली. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आधी घोषणायुद्ध झाले व त्याचे पर्यवसान आधी हमरीतुमरी आणि नंतर धक्काबुक्कीमध्ये झाले. विधिमंडळाच्या आवारात आजवर कधीही घडली नाही अशी ही लाजिरवाणी घटना साऱ्या महाराष्ट्राने पाहिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्यात जबरदस्त धुमश्चक्री उडाली. दोन्ही बाजूंचे एकेरीवर तर आलेच; मग मोठी गुद्दागुद्दीही झाली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संयमाने परिस्थिती हाताळली म्हणून पुढील भयंकर प्रकार टळला अन्यथा विधिमंडळाच्या आवारात काय घडले असते हे कोणीच सांगू शकणार नाही. असभ्य शब्दांचा वापर, अर्वाच्य शिवीगाळ आणि खेचाखेची व धक्काबुक्कीची ही घटना पाहून विधान भवनाच्या निर्जीव भिंतींनीही नक्कीच अश्रू ढाळले असतील. पुन्हा आश्चर्य असे की, एवढे सगळे केल्यानंतर सत्तारूढ शिंदे गटाच्या एका आमदाराने थेट मीडियाशी बोलताना ‘ये तो एक ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है’, अशी धमकीच दिली. याला सत्तेचा माज नाहीतर काय म्हणायचे! ‘पन्नास खोके, एकदम ओक्के, ओला दुष्काळ जाहीर करा, पूरग्रस्तांना मदत करा, गाजर देणं बंद करा’, अशा विरोधी आमदार देत होते. राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी जनतेला केवळ गाजर दाखवणाऱ्या सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी गळ्यात गाजराचा हार घातला होता. हा हार हिसकावून घेण्याचा प्रयत्न शिंदे गटाच्या आमदारांनी केला. त्यावरून पुढचा सारा लाजिरवाणा प्रकार सत्तारूढ गटाने घडवला. “आम्ही खोक्यांवरून केलेली घोषणाबाजी सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी लागली आणि त्यांनी धक्काबुक्की केली”, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नोंदवली. घडलेला घटनाक्रम याच प्रतिक्रियेला बळ देणारा आहे.

महाराष्ट्राच्या विधिमंडळाने अनेक थोर आणि अभ्यासू लोकप्रतिनिधी, मुख्यमंत्री, मंत्री आणि तेजतर्रार विरोधी पक्षनेतेही पाहिले. सभागृहात आणि सभागृहाबाहेर विरोधक तेव्हाही आक्रमक होत असत; पण त्या लढाईत व्यक्तिगत कटुता कधीच नव्हती. सत्तारूढ पक्ष व विरोधक दोन्ही बाजूंनी शालिनता कधीच सोडली नव्हती. पण महाराष्ट्राच्या विधिमंडळ आवारात बुधवारी जे घडले तो या शालीन परंपरेच्या चिंधड्या उडवणारा प्रकार होता. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही हे खरेच; पण सत्तेवर असलेल्यांनी संयमी असायला हवे. हा संकेत आजवरच्या सर्वच सत्ताधाऱ्यांनी आवर्जून पाळला. आता मात्र तसे होताना दिसत नाही. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्तेवर असलेल्यांचे सध्या एकच धोरण आहे. एकतर विरोधकांना देशाचे शत्रू ठरवायचे, बोली लावून त्यांना खरेदी करायचे आणि ऐकलेच नाही तर फुटकळ प्रकरणात चौकशा लावून त्यांना तुरुंगात डांबायचे. विरोधकांचा आवाज दडपण्याचा देशाच्या राजधानीतून आलेला हा साथीचा आजार आता गुजरात- आसाम रिटर्न सरकार महाराष्ट्राच्या सत्तेवर आल्यानंतर राज्याच्या राजधानीतही पसरला नसता तरच नवल! विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आमदारांकडून जी धुमश्चक्री घडवली गेली त्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली ती अशी की, सुरळीत राज्यकारभार करण्यावर या सरकारचा विश्वास दिसत नाही. संसदीय लोकशाहीच्या मूल्यांची जपणूक वगैरे शब्दांशी सपशेल फारकत घेऊन गोंधळ करण्यावरच भर द्यायचा, असे धोरण तर गुवाहाटी फेम सरकारने आखले नाही ना, अशी शंका आता विरोधकांनाच नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेलाही येउ लागली आहे.

महाराष्ट्राच्या विधिमंडळाला एक समृद्ध अशी राजकीय परंपरा आहे; पण ही मौलिक परंपरा पायदळी तुडवतानाचे दृश्य बुधवारी साऱ्या जगाने बघितले. सत्तारूढ शिंदे गटाने विधिमंडळाच्या आवारात घडवलेल्या धुमश्चक्रीमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. त्यानंतरही ‘ये तो एक ट्रेलर था,’ अशी धमकी दिली जात असेल तर शिंदे गट भविष्यात महाराष्ट्राला कोणता ‘पिक्चर’ दाखवण्याच्या तयारीत आहे? अर्थात सरकारचा हा गुवाहाटीफेम सिनेमा म्हणा किंवा तमाशा, महाराष्ट्राची जनताच उद्या डब्यात घातल्याशिवाय राहणार नाही, एवढे ध्यानात ठेवा!

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.