एकट्याने लढण्याची चंद्रकांतदादांची खुमखुमी चांगलीच जिरली; शिवसेनेचा सणसणीत टोला

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या निवडणुकीपूर्वी आत्मविश्वासाने सांगत होते की, "आम्ही विधान परिषदेच्या सर्वच्या सर्व जागा जिंकू. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र लढले तरी विजय आमचाच होणार आहे."

एकट्याने लढण्याची चंद्रकांतदादांची खुमखुमी चांगलीच जिरली; शिवसेनेचा सणसणीत टोला
Follow us
| Updated on: Dec 05, 2020 | 6:59 AM

मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी नुकत्याच निवडणुका (MLC Elections 2020 ) झाल्या. त्यातील पाच जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. तर धुळे-नंदुरबार विधान परिषदेची जागा काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या अमरीश पटेल यांनी जिंकली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) या निवडणुकीपूर्वी आत्मविश्वासाने सांगत होते की, “आम्ही विधान परिषदेच्या सर्वच्या सर्व जागा जिंकू. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र लढले तरी विजय आमचाच होणार आहे”, असे ते सांगत होते. परंतु प्रत्यक्षात त्यांना सहापैकी केवळ एकच जागा जिंकता आली. तसेच भाजपचे बालेकिल्ले असलेले पुणे आणि नगापूरचे मतदारसंघदेखील त्यांनी या निवडणुकीत गमावले. या पराभवानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले की, “आम्ही एकटे लढलो म्हणून हरलो”. तसेच त्यांनी महाविकास आघाडीतील पक्षांना “हिंमत असेल तर एकटे लढा”, असे आव्हानही दिले. चंद्रकांतदादांच्या या वक्तव्याचा शिवसेनेने (ShivSena) चांगलाच समाचार घेतला आहे. “आम्ही सर्वशक्तिमान आहोत, आम्ही एकटेच लढणार आणि जिंकणार ही खुमखुमी चंद्रकांत पाटलांची होती, ती चांगलीच जिरली आहे.” असा टोला शिवसेनेने लगावला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून शिवसेनेने भाजपचा समाचार घेतला. (ShivSena slams Chandrakant Patil after celebrated victory in graduate and teachers constituency election)

‘सामना’मधील अग्रलेखामध्ये म्हटले आहे की, महाविकास आघाडीचे सरकार तीनचाकी आहे, अशी टीका भाजपसारखे विरोधक वर्षभर करीत होते. यावर ‘‘सरकारला चाके चारच आहेत, चौथे चाक जनतेच्या विश्वासाचे आहे,’’ असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी हाणला होता. तो विश्वास स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या शिक्षक, पदवीधर निवडणुकांनी खरा ठरवला. विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुका झाल्या. त्यातील पाच जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. धुळे-नंदुरबार विधान परिषदेची जागा काँग्रेसमधून भाजपात शिरलेल्या अमरीश पटेल यांनी जिंकली. अमरीश पटेल यांची अशा प्रकारच्या निवडणुका जिंकण्याची कार्यपद्धती किंवा कौशल्य ज्यांना माहीत आहे ते या विजयाचे श्रेय भारतीय जनता पक्षाला देणार नाहीत. पदवीधर, शिक्षक मतदारसंघ म्हणजे भारतीय जनता पक्षाचीच मक्तेदारी होती. शिकले-सवरलेले, सुशिक्षित, सारासार विचार करणारे मतदार हे भाजपलाच मतदान करतात या भ्रमाचा भोपळा आता फुटला आहे. शिक्षक, पदवीधरांनी महाराष्ट्रात सर्वत्र महाविकास आघाडीलाच मतदान केले.

सर्वात धक्कादायक निकाल नागपूरचा आहे. गेल्या पाच दशकांपासून नागपूर पदवीधर मतदारसंघावर भारतीय जनता पक्ष विजयी होत आहे. नितीन गडकरी यांनी नागपूरच्या पदवीधरांचे प्रतिनिधित्व पंचवीसेक वर्षे केले, पण त्याआधी गंगाधरपंत फडणवीस हे अत्यंत प्रामाणिक, कष्टाळू संघ नेते नागपूरकर पदवीधारकांचे नेतृत्व विधान परिषदेत करीत होते. सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गंगाधरपंतांचे सुपुत्र. त्यामुळे हा मतदारसंघ किती संघमय झाला होता ते कळेल. संघाचे मुख्यालय नागपुरात आहेच, पण संघ विचारी लोकांचे संघटन मजबूत असताना नागपूरचे महापौर संदीप जोशी यांना पराभव पत्करावा लागला. काँग्रेसचे अभिजित वंजारी येथे विजयी झाले, याचे आम्हाला आश्चर्य वाटत नाही. कारण विधानसभा निवडणुकांतच नागपुरातील दोन जागा भाजपने गमावल्या व उरलेल्या तीन जागांवर भाजपचा निसटता विजय झाला होता. हे चित्र काय सांगते? बालेकिल्ल्यास सुरुंग लागलेच होते, आता पायाच खचला. त्यामुळे भाजपनेही फार मनास लावून घेऊ नये.

अमरावती शिक्षक मतदारसंघातही भाजप मागे पडला आहे. संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचेच सतीश चव्हाण मोठ्या मताधिक्याने जिंकले. पुण्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातही भाजपचा पराभव झाला. पुणे पदवीधरसुद्धा भाजपचाच गड होता. अनेक वेळा तेथे प्रकाश जावडेकर विजयी होत. नंतर सध्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुणे पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व करीत होते. पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व करीत असतानाच ते महाराष्ट्राचे महसूलमंत्री, प्रदेशाध्यक्ष झाले. विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी कोल्हापुरातून पुण्यात आले व आता त्यांच्याच नेतृत्वाखाली पुण्याचा पदवीधर मतदारसंघ भाजपने गमावला. पुण्याच्या शिक्षक मतदारसंघातही भाजप पराभूत झाला. पुणे पदवीधर, शिक्षक हा तसा पांढरपेशांचा मतदारसंघ पण बहुधा सदाशिव पेठ, कसबा पेठ, कोथरूड, नाना पेठ, डेक्कन परिसरांतील मतदारांनीही चंद्रकांतदादांच्या आवाहनास झिडकारलेले दिसते. कोल्हापूर, सातारा, सांगलीचा तर प्रश्नच येत नाही, असे एकंदरीत मतदान झालेले दिसले. आता चंद्रकांतदादा म्हणतात, आम्ही एकटे लढलो म्हणून हरलो. ते खरे आहे, पण आम्ही सर्वशक्तिमान आहोत व एकटेच लढणार व जिंकणार ही खुमखुमी त्यांचीच होती. ती चांगलीच जिरली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची महाविकास आघाडी एकत्र लढली यापेक्षा एकदिलाने लढली हे महत्त्वाचे. भाजप-शिवसेना एकत्र लढत होते तेव्हा शिवसेनेची टांग खेचण्यासाठी जागोजागी गुप्त बंडखोर उभे करून भाजप खेळ बिघडवत होता. आता तिघांत तसे झाले नाही. यापासून धडा घ्यायचा आहे तो भाजपने. नागपूर व पुण्यातील भाजपचा पराभव ही बदललेल्या वादळी वाऱ्याची चाहूल आहे. वाऱ्याने एक दिशा पकडली आहे व राज्यातील साचलेला, कुजलेला पालापाचोळा उडून जाणार आहे. नागपुरातील पराभव धक्कादायक आहे, तितकाच पुण्यातील पराभवही भाजपसाठी ‘आत्मक्लेश’ करून घ्यावा असाच आहे.

नागपुरातील विद्यमान आमदार अनिल सोले यांच्याऐवजी विद्यमान महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी दिली. आधीचे उमेदवार नितीन गडकरी यांना मानणारे होते. जोशी हे फडणवीस कंपूचे. नागपुरातील दोन कंपूत भाजप फुटला आहे हे कटुसत्य आहेच. स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल म्हणजे जनतेचा कौल नाही, अशी वचवच सुरू आहे. लाखो शिक्षक व पदवीधरांनी दिलेले मत कौल नसेल तर मग ईव्हीएम घोटाळ्यातून ओरबाडलेल्या विजयास कौल म्हणायचे काय? पुणे व संभाजीनगरचे काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार लाखावर मतांनी जिंकले आहेत. शिक्षक मतदारसंघात 50 हजारांवर मतांनी जय झाला आहे. विदर्भातील विजय त्यादृष्टीने जास्त महत्त्वाचा. काँग्रेसचे सर्व गट-तट, नेते मंडळी एकत्र आल्यावर काय चमत्कार घडतो ते दिसले.

या विजयातून दिल्लीतील मरगळलेल्या काँग्रेस हायकमांडनेही बोध घ्यायला हवा. भाजपचे गड एकजुटीने पाडले जाऊ शकतात. महाराष्ट्रात ते दिसले. महाराष्ट्रातील भाजप लोकांपासून, समाजातील सर्वच घटकांपासून दूर जातो आहे. पक्ष संघटना अंतर्गत कलहाने जर्जर झाली आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या हाती भाजपची सूत्रे आहेत. ही दिल्लीश्वरांची इच्छा, पण जनतेची इच्छा काय ते नागपूर, पुणे, संभाजीनगरच्या पदवीधर व शिक्षकांनी दाखवून दिले आहे. पदवीधर-शिक्षक मतदारसंघातही ‘जात’ हाच आधार मानून उमेदवाऱ्या दिल्या. भाजपला त्याची किंमत चुकवावी लागली. महाविकास आघाडीचे सरकार हे अनैसर्गिक आहे, त्यांना जनतेचा पाठिंबा नाही असे बोलणाऱ्यांनी शिक्षक-पदवीधरांनी दिलेल्या निकालाकडे जाड भिंगाचा चष्मा लावून पाहावे. ‘‘आम्हीच येणार व आम्हीच जिंकणार’’ हा तोरा बरा नाही. ‘‘विधान परिषदेच्या सहापैकी सहा जागा जिंकू’’, अशा आरोळय़ा चंद्रकांत पाटील ठोकत होते. शरद पवार हे लोकनेते नाहीत असे बोलण्यापर्यंत त्यांची मजल गेली तेव्हा लोकांनीच त्यांना खाली पाडले. वर्षभरापूर्वी 105 आमदार येऊनही सत्ता गेली. तेव्हापासून महाराष्ट्र भाजपास सुतक लागले. कालच्या नागपूर-पुण्यातील पराभवाने आणखी एक सुतक लागले. एका वर्षात दोनदा सुतक लागणे हे हिंदू शास्त्रानुसार चांगले नाही. भाजपला काहीतरी तोड करावीच लागेल.

संबंधित बातम्या

भाजप बेसावध, ससा-कासवाच्या गोष्टीप्रमाणे पदवीधरमध्ये जिंकून येण्याचा आभास : मुनगंटीवार

आम्ही एक तरी जिंकलो, पण ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा नाही : देवेंद्र फडणवीस

ये क्या हुआ? कैसे हुआ? कब हुआ? क्यों हुआ?, विरोधकांच्या गर्विष्ठ माना जनतेने वाकवल्या; अनिल देशमुखांची खोचक टीका

(ShivSena slams Chandrakant Patil after celebrated victory in graduate and teachers constituency election)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.