हल्लेखोर फेरिवाल्याची मानसिकता ठेचायला हवी, मनसे आक्रमक; गृहमंत्र्यांवरही शरसंधान
राज ठाकरे यांनीही कल्पिता पिंपळे यांना आश्वासन दिलं आहे की, तुम्ही बरे व्हा बाकी जबाबदारी आमची. त्यामुळे पिंपळे यांच्याबद्दल घेतलेली जबाबदारी आम्ही पार पाडू. आम्ही धडा कसा शिकवणार हे कुणालाही सांगायची गरज नाही. अनेक लोकांना त्याचा अनुभव आहे. राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्याला प्रसाद देऊ, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिलाय.
ठाणे : अनधिकृत फेरिवाल्यानं एका महिला अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला केलाय. या हल्ल्यात अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांची दोन बोटं छाटली गेली आहे. सध्या यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. मात्र, आता अनधिकृत फेरिवाल्यांविरोधात मनसेनं आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याबाबतचे संकेत दिले आहेत. हल्लेखोर फेरिवाला पोलिसांच्या ताब्यातून बाहेर पडल्यावर भीती काय असते ते आम्ही त्याला दाखवून देऊ, असं इशाराच राज यांनी दिलाय. त्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनीही अशा लोकांची मानसिकता ठेचली गेली पाहिजे. राज ठाकरे यांनी आम्हाला आदेश दिला आहे, त्याचं पालन करु, असं म्हटलंय. (Thane attack on a female officer by a peddler, MNS leader Avinash Jadhav’s warning)
आज एका महिला अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला झालाय. उद्या अन्य अधिकाऱ्यांवर होईल. जिल्हाधिकाऱ्यांवरही असा हल्ला होईल. कायद्यानेही त्या फेरिवाल्याला सोडू नये. पोलिसांनी कडक शासन केलं पाहिजे. राज ठाकरे यांनीही कल्पिता पिंपळे यांना आश्वासन दिलं आहे की, तुम्ही बरे व्हा बाकी जबाबदारी आमची. त्यामुळे पिंपळे यांच्याबद्दल घेतलेली जबाबदारी आम्ही पार पाडू. आम्ही धडा कसा शिकवणार हे कुणालाही सांगायची गरज नाही. अनेक लोकांना त्याचा अनुभव आहे. राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्याला प्रसाद देऊ, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिलाय.
वळसे-पाटलांवर टीका
आम्ही राजकीय अजेंडा राबवत आहोत असं जर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांना वाटत असेल तर मग युवासेनेचे वरुण सरदेसाई यांना अटक केली पाहिजे. त्यांनी सर्वच ठिकाणी राजकीय अजेंडा राबवला. नारायण राणे यांच्या घराखाली गेलेल्या वरुण सरदेसाईंना अटक झाली पाहिजे. एक दिवस दहीहंडी साजरी केली म्हणून आमच्यावर कारवाई होत असेल तर शिवसेना एकप्रकारे रोजच उत्सव साजरा करतेय, असा टोलाही त्यांनी लगावलाय.
बाळा नांदगावकरांचाही वळसे-पाटलांना सवाल
मनसे नेत्यांनी सरकारचे निर्बंध धुडकावून लावत दहिहंडी साजरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून मनसे नेत्यांवर कारवाई करण्यात आलीय. या कारवाईबाबत बोलताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना सवाल केलाय. आम्ही परंपरा पुढे नेत आहोत. दहीहंडी किंवा श्रीकृष्ण हे राजकीय अजेंडा आहेत का? आम्ही काही केलं तर तो राजकीय अजेंडाच असतो का? तुम्ही काही करत असाल तर तो राजकीय अजेंडा ठरत नाही का? असे प्रश्न बाळा नांदगावकर यांनी केले आहेत.
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी जे वक्तव्य केलं त्याचा सन्मान राखतो. पण त्यांनीही विचार केला पाहिजे. हिंदू म्हणून आमच्याही भावना आहेत. त्या व्यक्त करण्याचा आम्हालाही अधिकार आहे. मोहरम झाला तेव्हाही गृहमंत्र्यांनी भूमिका मांडली पाहिजे होती. तेव्हा कोर्टाचा आधार घेता. आम्हीही लोकांची काळजी घेऊ. पण राजकीय लग्न असताना कुणी काळजी घेत नाही. राणेंच्या घराबाहेर हजारो लोक जमले तेव्हा गृहमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली नाही, असा खोचक टोला नांदगावकर यांनी वळसे-पाटलांना लगावलाय.
इतर बातम्या :
अटक,धरपकड करायला गोविंदा काय लादेन आहे का?; आशिष शेलारांचा आघाडी सरकारला संतप्त सवाल
मुंबईतील ‘त्या’ नऊ मजली इमारतीशी तुमचा संबंध काय?; किरीट सोमय्यांचा भुजबळांना सवाल
attack on a female officer by a peddler, MNS leader Avinash Jadhav’s warning