AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray | प्रत्येक वाक्यात घणाघात, पंतप्रधानांची पदवी ते दंड, अमित शाह यांना खोचक सवाल, उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील 15 मुद्दे

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली, त्यांच्या भाषणातील 15 महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी आम्ही थोडक्यात माहिती देणार आहोत.

Uddhav Thackeray |  प्रत्येक वाक्यात घणाघात, पंतप्रधानांची पदवी ते दंड, अमित शाह यांना खोचक सवाल, उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील 15 मुद्दे
| Updated on: Apr 02, 2023 | 10:24 PM
Share

छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीची आज छत्रपती संभाजीनगर येथे पहिली एकत्रित जाहीर सभा पार पडली. या जाहीर सभेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार घणाघात केला. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांवर जोरदार घणाघात केला. देशातील लोकशाही धोक्यात असल्याचं ठाकरे म्हणाले. तसेच महाविकास आघाडीची वज्रमूठ आता अशीच अबाधित राहील, असं देखील  ठाकरेंनी म्हटलं. या सभेत त्यांनी आपल्या प्रत्येक वाक्यातून भाजपवर निशाणा साधला. त्यांच्या भाषणातील 15 महत्त्वाच्या मुद्यांविषयी थोडक्यात माहिती देणार आहोत.

1) ‘औरंगाबादच्या नामांतरावरुन मविआ सहकाऱ्यांचा आभारी’

संभाजीनगरमध्ये मी यापूर्वी अनेकदा आलेलो आहे. या व्यासपीठावरुन मी अनेकदा आपल्याशी संवाद साधला आहे. गेल्यावर्षी ८ जूनला होतो तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. मी ज्या-ज्यावेळेला या मैदानावर येतो तेव्हा गर्दीचा दुष्काळ बघितलेला नाही. आज अभिमान, समाधान आणि आनंदाने आलेलो आहे. कारण हेच ते मैदान, हेच ते शहर, जिथे १९८८ साली आपण महापालिका शिवसेनेच्या हाती दिल्यानंतर शिवसेना प्रमुखांनी या शहराचं नाव संभाजीनगर करतोय असं म्हटलं होतं. त्यानंतर काय घडलं ते आपण पाहिलं. आपण २५ वर्ष भ्रमात होतो. दोनवेळा आपलं सरकार आलं. दोन्ही वेळेला केद्रात आणि राज्यात युतीचं सरकार होतं. पण औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर झालं नव्हतं. त्यामुळे मी मविआच्या सहकाऱ्यांना धन्यवाद मानतो की त्यांनी ते करुन दाखवलं. यावरुन त्यांची वृत्ती समजून आलीय.

2)’…मग जगातल्या सर्वात शक्तिमान हिंदू नेत्याची काय शक्ती आहे?’

निवडणुका आली की जातीय तेढ निर्माण करायची. ज्यावेळेला जातीय तेढ निर्माण होईल तेव्हा समजा निवडणुका जवळ आल्या आहेत. गौरव यात्रेचा उल्लेख केला गेला. जरुर काढा. हिंदू जनआक्रोश नवीन सुरु झालाय. मुंबईत मोर्चा निघाला होता. कुठून काढला माहिती नाही. पण शिवसेना भवनपर्यंत आला होता. याचा अर्थ एकच जगातला सर्वात शक्तिमान हिंदू नेता या देशाचा पंतप्रधान झाल्यानंतर हिंदूंना आक्रोश करावा लागतोय मग नेत्याची काय शक्ती आहे? मविआच्या सरकारमध्ये कोणत्याही समूदायाला आक्रोश करण्याची वेळ आली नव्हती. गेल्या रविवारी मालेगावात असंख्य हिंदू बांधव सभेसाठी आले होते. आताही आलेत, असं ठाकरे म्हणाले.

3) “…तेव्हा तुम्ही हिंदुत्व सोडलं नाही का?

माझ्यावरती आरोप करत आहेत. मी हिंदुत्व सोडलं. या छत्रपती संभाजीनगरच्या मैदानात विचारतो की मी खरंच हिंदुत्व सोडलं तर एक उत्तर द्या. मी घरात जावून बसेन. पुन्हा तोंड दाखवणार नाही. जातीय रंग देत असाल तर हा घटनेचा अवमान आहे. मी म्हणजे आम्ही महाविकास आघाडी. तुम्ही म्हणता, आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं. मी काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं असेल तेव्हा मेहबूबा मुफ्ती बरोबर काश्मीरमध्ये सरकार बनवलं तेव्हा तुम्ही हिंदुत्व सोडलं नाही का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

4) ‘पंतप्रधानांची पदवी दाखवा म्हणून मागितलं तर 25 हाजारांचा दंड बसतो’

तुमची मस्ती असेल तर ती गाढण्यासाठी वज्रमूठ उभारली आहे. लाखो युवक सुशिक्षित आहेत. अनेकांची परिस्थिती बेताची आहे. कर्ज काढून पदवी मिळवेलेली आहे. अलिकडे डॉक्टरेटही विकत घेता येते. काहीजणं पाणीचं इंजेक्शन घेऊन फिरतो. अनेकजण पदव्या दाखवतात पण किंमत मिळत नाही. तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधानांना पदवी दाखवा म्हणून मागितलं तर २५ हजारांचा दंड बसतो. आज या व्यासपीठावर जयंत पाटील आणि मी आहे. आम्ही दोघं एकाच शााळेचे आहोत. बालमोहन विद्यामंदिरचे आहोत. त्या शाळेला मंत्री झाल्यानंतर अभिमान वाटला होता. असा अभिमान पंतप्रधान ज्या कॉलेजमध्ये शिकले त्यांना का वाटू नये? पदवी मागितली तर दाखवणार नाही. मग या पदवीचा उपयोग दंड भरण्यासाठी घेता का काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

5) ‘मग तुम्ही सत्तेसाठी मिंध्यांचं काय चाटताय?’

“मला एक सांगा, मविआचं सरकार पसंत होतं की नव्हतं? छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं नाव घेतो आणि पाठीत वार करायचा? हो आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो होतो. पण सत्ता गेल्यानंतरही साथ आहोत. असं काही नाही की, मला शिवसेना प्रमुखांची भाषा येत नाही. पण मला आवरावी लागते. खरंतर त्यांनाच ती भाषा शोभायची. मला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विचारायचं आहे, आम्ही सत्तेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे तळवे चाटतो. मग तुम्ही सत्तेसाठी मिंध्यांचं काय चाटताय? चांगली चाललेली सरकारं फोडायची आणि पाडायची. नितीश कुमार आणि लालू यादव यांचं सरकार पाडून तुम्ही काय चाटत होता?”, असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

6) ‘तुमच्या पक्षाचं नाव भ्रष्ट जनता पार्टी ठेवा’

“मोदी म्हणतात मेरी प्रतिमा खराब करने का काम चल रहा है. मग आमची प्रतिमा नाही का? तुमचा कुणीही सोम्या गोम्या आमच्यावर काहीही म्हणायचं. मोदींना म्हटलं की ओबीसींचा अपमान. तुमचं नाव भाजप आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास दिलं जातंय. विरोधी पक्षामध्ये दिसला भ्रष्ट की घेतला पक्षात. सर्व विरोधी पक्षाचे भ्रष्ट नेते भाजपात. तुमच्या पक्षाचं नाव भ्रष्ट जनता पार्टी ठेवा”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

7) ‘देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेला’

“अजित पावारांनी जो उल्लेख केला की, मराठवाडा साधुसंतांचा आहे. एकेकाळी भाजपच्या मंचावर साधुसंत असायचे. पण आता संधीसाधू असतात. तो जमाना अटलजींचा होता. या देशातील लोकशाही संपवून टाकायची, एकही विरोधी पक्ष या देशात शिल्लक ठेवायचा नाही. राहिला तर जेलमध्ये टाकायचं. देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेला चाललीय. सावरकरांची यात्रा काढताय तर काढा. पण त्यांचं अखंड हिदुस्तानचं स्वप्न पूर्ण कराल का?”, असा सवाल त्यांनी केला.

8) ‘जमीन दाखवायची असेल तर…’

“अमित शाह म्हणाले शिवसेनेला जमीन दाखवायची आहे. जमीन दाखवायची असेल तर पाकव्याप्त काश्मीरची जमीन घेऊन दाखवा. सरदार वल्लभाई पटेल यांचा मोठा पुतळा बांधला आहे. वल्लभाई नसते तर मराठवाडा मुक्त झाला असता की नाही? हा प्रश्न आहे. तीच हिंमत तुम्ही पाकव्याप्त काश्मीरमध्ये का दाखवत नाही? घुसवा फौजा. पण निवडणुका आल्यानंतर काहीतरी करणार आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या”, अशी टीका ठाकरेंनी केली.

9) ‘लोकशाही कशी असली पाहिजे तर इस्त्राईलसारखी’

“लोकशाही कशी असली पाहिजे तर इस्त्राईलसारखी असली पाहिजे. जो घातक प्रकार आख्य़ा देशात भाजप करु इच्छित आहे, न्यायव्यवस्थेत आपली माणसं घेऊ पाहत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आमचं ऐकलंच पाहिजे, असे प्रयत्न सुरु आहेत. ज्यादिवशी न्यायालयावर यांच्या ताब्यात जाईल त्यादिवशी लोकशाही संपेल. इस्ज्ञाईलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र. नेत्यान्याहू यांनी तसा प्रयत्न केला तेव्हा देशाने संप पुकारला. मंत्री, पोलीस प्रमुख संपावर गेले. राष्ट्रपतींनीसुद्धा पंतप्रधानांना झापलं. लोकांनी एवढा प्रचंड प्रतिसाद दिल्यानंतर पंतप्रधानांना घराबाहेर पडणं मुश्किल झालं”, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

10) ‘वडील चोरण्याचा प्रयत्न करत आहेत, यांना बापसुद्धा इतरांचा लागतो’

“आज सुद्धा माझ्या हातात काही नाही. चांगले दिवस असतात त्यावेळेला कोण असतं? ज्यावेळेला भाजप अस्पृश्य होती तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी साथ दिली होती. भाजपसोबत आहे कोण? शिवसेना, अकाली दल सोबत नाही. ज्यावेळेला गरज होती तेव्हा वापरुन घेतलं आणि आता लात मारत आहेत. त्यांना खाली खेचायचं आहे. आज त्यांनी आपल्या पक्षाचं नाव आणि चिन्ह चोरलं. एवढंच नाही तर वडील चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. अरे स्वत:च्या वडिलांना किती त्रास होत असेल, यांना बापसुद्धा इतरांचा लागतो. मी माझ्या वडिलांचं नाव सोडणार नाही. मी भाजपला आव्हान देतो हिंमत असेल तर मोदींनी यावं आणि त्यांच्या नावाने मतं मागावी”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

“आज मित्रपक्ष कठीण काळात सोबत राहीले हे विसरु नका. तुम्ही माझं काय चोरणार. मला माझ्या जगदंबेचे आशीर्वाद आहेत. तुमच्या सभेला तुम्ही माणसं भाड्याने लागतात. सभेतही वाचू का विचारतात. तुम्ही दुसऱ्याचे विचार मांडता. तुमच्यासमोर ठेवलेलं कदाचित तुम्ही वाचाल. पण समोर बसलेली जनता तुम्हाला वाचवू शकणार नाही. जनतेशी खेळ करु नका”, असं ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.

11) आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना टोला

“आमचं सरकार खेळणारं नाही तर देणारं आहे म्हणे. काय दिलं? तरुणांना रोजगार दिलं. शेतकऱ्यांना हमीभाव दिला? राजेश टोपे यांनी आरोग्य खातं ज्या पद्धतीने सांभाळलं होतं त्याबद्दल धन्यवाद देतो. राजेश टोपे यांना औषधांचं नाव तोंडपाठ होतं. पण आताचे आरोग्य मंत्रा आहेत ते… जाऊद्या त्यांच्यावर कोणताही विषय बोलण्यासारखं नाही”, असा टोला त्यांनी लगावला.

12) ‘महिलेला शिवीगाळ करणं ही गटारगंगा मी खपवून घेणार नाही’

“आम्ही प्रश्न विचारतो तेव्हा सीबीआय, ईडी घरात घुसवता. अनिल देशमुख यांच्या नातेची चौकशी करता, तेजस्वीच्या पत्नीची बेशुद्ध होईपर्यंत चौकशी करत होता हे तुमचं निर्घृण हिंदुत्व. कशाला हिंदुत्वाचं नाव घेता? ज्या छत्रपतींना कल्याणच्या सुभेदारांच्या सूनेला सन्मानाने परत पाठवलं होतं हे आमचं हिंदुत्व होतं. एक नेता आमच्या सुषमा अंधारेंना खालच्या पातळीवर बोलतो हे तुमचं हिंदुत्व नव्हतं. हे ज्यावेळेला शिवसेनेत होते तेव्हा त्यांचं तसं बोलण्याची हिंमत नव्हती. हाकलून दिलं असतं. महिलेला शिवीगाळ करणं ही गटारगंगा मी खपवून घेणार नाही. तुम्ही भगवा हाती घेऊ नका, तो तुम्हाला शोभत नाही”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी ठणकावलं.

13) ‘मिंधेंचं ओझं डोक्यावर घेऊन निवडणूक लढवणार आहात का?’

“नुस्ती सत्ता पाहिजे. हो दिली ना सत्ता. आम्ही तुमच्यासोबत होतो. मी शिवेसनाप्रमुखांना काय वचन दिलं होतं की, शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवेन. मी मुख्यमंत्री होईन, असं वचन दिलं नव्हतं. हे मी अमित शाह यांना स्पष्ट सांगितलं होतं. आजसुद्धा तुम्ही शिवसेना फोडली. पण तरीही हृदयावर दगड ठेवून बसला आहात ना? मिंधेंचं ओझं डोक्यावर घेऊन निवडणूक लढवणार आहात का? हा फसवणुकीचा खेळ कशासाठी चालवला आहे? शिवसेना संपवण्यासाठी? पण ते तुम्हाला पेलवणार नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

14) ‘स्वातंत्र्य धोक्यात आहे’

“ही आमची सभा. या सभेला वज्रमूठ असंच नाव दिलेलं नाही. तुम्ही आमचे हात घ्यायला निघालात. बाळासाहेबांनी शिवसैनिकाला मोठं करण्याची वृत्ती दिली. मोठी करणारी माणसं आज माझ्यासोबत आहेत. महाविकास आघाडीची वज्रमूठ आहे. ही वज्रमूठ भारत मातेचं रक्षण करण्यासाठी आहे. ज्या महाराष्ट्रात आम्ही जन्मलो, सोसला, अगदी सावरकरांचे भक्त आले असते, ज्या सावरकरांनी 14 वर्ष भोगलं तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी भोगलं. तेच स्वातंत्र्य धोक्यात आहे हे भाजपमधल्या सावरकर भक्तांना मान्य आहे का? आपल्याला संविधानाचं रक्षण करायचं आहे नाहीतर आपणच आपल्या देशात गुलाम होऊ. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

15) ‘एका कांद्याला ५० खोके, मग कांद्याच्या शेतकऱ्याला किती पैसे मिळायला पाहिजेत?’

“आता कोरोना वाढतोय. मी जे काम घरातून केलं ते तुम्ही दिल्ली, गुवाहाटी जावून होणार नाही. परवा मी मालेगावात गेलो होतो. गेल्यावर्षी एका कांद्याची खरेदी झाली. एका कांद्याला ५० खोके, मग कांद्याच्या शेतकऱ्याला किती पैसे मिळायला पाहिजेत?” असा टोला त्यांनी लगावला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.