Bhaskar Jadhav : अनुभवी भास्कर जाधवांना डावलून आदित्य ठाकरेंना विरोधी पक्ष नेतेपद का? अखेर जाधव या पदाबद्दल बोलले
Bhaskar Jadhav :विरोधी पक्षनेते पदावरुन ठाकरे गटातच अंतर्गत स्पर्धा सुरु झाल्याची चर्चा आहे. कारण विरोधी पक्ष नेतेपदासाठी आतापर्यंत भास्कर जाधव प्रबळ दावेदार मानले जात होते. पण आता आदित्य ठाकरेंच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. अखेर या पदाबद्दल भास्कर जाधव बोलले आहेत.

आजपासून महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. विरोधी पक्ष नेतेपदाचा मुद्दा महाविकास आघाडी खासकरुन ठाकरे गटाने लावून धरला आहे. पण विरोधी पक्षनेते पदावरुन ठाकरे गटातच अंतर्गत स्पर्धा सुरु झाल्याची चर्चा आहे. कारण मागच्या अनेक महिन्यांपासून विरोधी पक्षनेते पदासाठी अनुभवी आमदार भास्कर जाधव यांचं नाव चर्चेत होतं. ते आक्रमक आमदार आहेत. आता भास्कर जाधव यांच्याजागी आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपदी नेमण्याची ठाकरे गटात चर्चा आहे. उद्धव ठाकरे स्वतः आदित्य ठाकरेंना हे पद मिळावे यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेतेपदावरुन सुरु झालेल्या चर्चेवर आता भास्कर जाधव स्वत: बोलले आहेत.
“मी यावर अनेकवेळा बोललो आहे. मुख्यमंत्र्यांचे विधान मी ऐकले. उपमुख्यमंत्र्यांचे लंबेचौडे भाषण ऐकले. मला लेखी पत्र विधीमंडळ सचिवालयाने दिले आहे. एकूण सदस्य संख्येच्या 10 टक्के असले पाहिजे असे खोटे सांगतात. माझे आव्हान आहे, घटनेतील तरतूद दाखवा” असं भास्कर जाधव म्हणाले. “कायद्यात तरतूद दाखवा. एखादा निर्णय दाखवा. तसे लेखी पत्र मी दिले, त्यांच्याकडून उत्तर घेतले आहे. अशी अट कुठेही नाही” असं भास्कर जाधव म्हणाले.
ते मला घाबरतात
“सरकार पडल्यापासून आपण पाहिले. उपसभापतींना पक्षांतर बदलीवर कारवाईसाठी कुठलाही अधिकार नाही. पण विधानसभा अध्यक्ष निवडीचा अधिकार आहे. खोटे बोल पण रेटून बोल सुरु आहे” अशा शब्दात भास्कर जाधव यांनी टीका केली. “मी आक्रमक आहे म्हणून विरोधी पक्षनेते पद देत नाही. ते मला घाबरतात, असे दिसते” असं भास्कर जाधव म्हणाले.
ती राजकीय सोय आहे
“उद्धव ठाकरे म्हणाले ते योग्य आहे. उपमुख्यमंत्री हे घटनात्मक पद नाही. ती राजकीय सोय आहे. त्याला कुठलेही अधिकार नाहीत. विरोधी पक्षनेते पदाला अधिकार आहेत” असं भास्कर जाधव यांनी सांगितलं. “महिलांबाबत कुठलाही आदर नाही. म्हणून हा शक्ती कायदा आणला नाही. लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले तर, कुठलाही अत्याचार झाला, तर आम्ही मते विकत घेतली असो सत्ताधाऱ्यांना वाटते” असं ते म्हणाले.
त्यांना आधीच क्लिनचीट देतात
“खून झाला किंवा मारामारी झाली तर मुख्यमंत्री भाष्य करत नव्हते. त्याचा चौकशीवर विपरित परिणाम होतो. पण आपले मुख्यमंत्री ज्यांना वाचवायचे असते, त्यांना आधीच क्लिनचीट देतात. मुख्यमंत्र्यांमुळे ही भावना अधिक बळावली आहे” असं भास्कर जाधव पार्थ पवारांवरील आरोपांवर म्हणाले.
