AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special story | यंदाच्या निवडणुकीचा बाजच न्यारा; ग्रामपंचायतीमध्ये राडा-धुरळा, उमेदवारही टेक्नोफ्रेन्डली

यंदाच्या निवडणुकीतील प्रचार हा पूर्ण डिजिटलाईज झाला असून प्रचाराची पद्धत, जिंकण्यासाठीचे डावपेच, आणि निवडणुकीसाठी लागणारा खर्च यासोबतच अशा अनेक गोष्टींमध्ये बदल झाल्याचे दिसत आहे. (grampanchayat election campaign method)

Special story | यंदाच्या निवडणुकीचा बाजच न्यारा; ग्रामपंचायतीमध्ये राडा-धुरळा, उमेदवारही टेक्नोफ्रेन्डली
| Edited By: | Updated on: Jan 15, 2021 | 7:52 PM
Share

मुंबई : जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशात कोणत्या ना कोणत्या निवडणुका सुरुच असतात. लोकसभा, विधानसभेपासून कधी पोटनिवडणुका, तर कधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देशात कुठे ना कुठेतरी होतच असतात. महाराष्ट्रात सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे ( gram panchayat election) वातावरण ढवळून निघालं आहे. राज्यात सध्या 34 जिल्ह्यांमधल्या तब्बल 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहे. प्रचार, विकासाचे वादे, कायापालटाचे स्वन यांची चंगळ सुरु आहे. या सगळ्या धांदलीत उठून दिसणारी गोष्ट म्हणजे ग्रामपंचायतींच्या या निवडणुकांमध्ये शासकीय स्तरापासून गावगल्लीपर्यंत अनेक बदल झाले आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मोठं स्थित्यंतर होत असून तिचा पोत बदलतो आहे. यंदाच्या निवडणुकीतील प्रचार हा पूर्ण डिजिटलाईज झाला असून प्रचाराची पद्धत, जिंकण्यासाठीचे डावपेच, आणि निवडणुकीसाठी लागणारा खर्च यासोबतच अशा अनेक गोष्टींमध्ये बदल झाल्याचे दिसत आहे. (special story campaign method in gram panchayat election has been changed in 2021)

राजा माणूस, दिलदार माणूस आणि राडा-धुरळ्याची निवडणूक

राजधानी दिल्लीपासून ते वाडी-वस्तीमध्ये राहणाऱ्या अडाणी माणसापर्यंत आजघडीला व्हॉट्सअ‌ॅप पोहोचलं आहे. या माध्यमामुळे संदेश वहन करण्यास अगदीच सोपं झालं आहे. याच माध्यमाचा वापर आज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत होताना दिसतोय. तरुण पोरांचे आणि जाणत्या माणसांचे स्टेटस पाहिल्यांनतर यंदाच्या निवडणुकीचा प्रचार कोणती शाल पांघरुन होत आहेत याची कल्पना येते. सर्वात प्रथम यावेळच्या निवडणुकीमध्ये उमेदवारासमोर विकासपुरुष, गावाच्या विकासाची जाण असलेला, राजा माणूस, दिलदार माणूस, लखलखती तलवार अशा थेट विशेषणांचा हमखास वापर केला जातोय. फोटो एडीटर, पिक्सेल लॅबासरख्या अॅपचा उपयोग करून उमेदवाराच्या हात जोडलेल्या फोटोसोबत ही विशेषणं आवर्जून लावली जात आहेत. एखादा फारच संवेदनशील उमेदवार असला तर सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा माणूस असल्याची इमेज बिल्डिंग (image building) केली जात आहे. विशेष म्हणजे स्टेटसवर उमेदवाराचा फोटो ठेवून मागे रिमिक्स, ढोल ताशांची शाही थाट असलेले व्हिडिओ व्हॉट्सअ‌ॅपवर हमखास शेअर केले जात आहेत. थोडक्यात ही निवडणूक तरुणांची निवडणूक झाली आहे. नवतंत्रज्ञानाच्या मदतीने गावातील लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रथमच होतोय.

‘बजट’ वाढलं, प्रवास खर्चापासून ते रोजंदारी देण्याचा वादा

ग्रामपंचायतीची निवडणूक जिंकायची म्हटलं की एका एका मताचा हिशोब होतो. आपला माणूस कोण आहे?, याचा शोध घेऊन त्याला हेरून त्याच्यावर पैसा खर्च केला जातो. या वर्षी निवडणुकीचा खर्च वाढल्याचं सांगण्यात येतंय. काही काही बडे आसामी तर 1500 हजार लोकसंख्येच्या गावात 10 लाखांपर्यंत खर्च करण्यास तयार आहेत. खेड्यामध्ये रोजगाराच्या संधी जास्त प्रमाणात नसल्यामुळे गावातील अनेक लोक पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर अशा मोठ्या शहरांची वाट धरतात. गाव सोडलेल्यांमध्ये तरुणांचे प्रमाण लक्षणीय आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ‘गाव सोडलेल्यांची’ आठवण आवर्जून केली जातेय. त्यांना सहज फोन करुन कधी येताय असं विचारलं जातंय. प्रवास खर्चापासून ते एका दिवसांची रोजंदारी देण्याचीही उमेदवारांची तयारी आहे. पार्ट्या, बंद पाकीटं याचा हिशोबही वेगळाच ठेवला जातोय. एकंदीत काय तर ‘यंदा भाऊचीच हवा’ म्हणत या ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रतिष्ठेच्या तर होत आहेतच, पण तेवढ्याच खर्चीकही झाल्या आहेत.

उमेदार टेक्नोफ्रेन्डली, विजयासाठी कॅम्पेनिंग

या वर्षी घरोघरी जाऊन हात जोडत मतदारांना साद घालण्यासोबतच उमेदवार टेक्नोफ्रेन्डली झाल्याचे पाहायला मिळत आहे. फेसबूक, व्हॉट्सअ‌ॅपवर उमेदवाराच्या विजयाचे कॅम्पेन चालवले जात आहे. एखाद्या रणनीतीकाराकडून (strategy maker) फक्त 700 रुपयात उमेदवाराच्या प्रचारासाठी एखादा व्हिडीओ दणकट व्हाईसओव्हरसोबत तयार केला जातोय. 30 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये आदर्श शिंदेचा दणकट आवाज वापरून ‘नाद करा पण आमचा कुठं’ म्हणत विजयाचा गुलाल उधळणार तर आम्हीच असं ठणकाऊन सांगितलं जात आहे. पॅनेलचे कॅम्पेनिंग करायचे असेल तर खास ऑफर या निवडणूक रणनीतीकारांकडून दिली जातेय. थोडे जनसंपर्काचे सूत्रं आणि तंत्रज्ञानाची मदत यांची सरमीसळ करुन ही निवडणूक विधानसभेच्या निवडणु कीसाखी केली जातेय.

महिलांचं काय स्थान?

सरपंच आणि उपसरपंचपासाठी आरक्षणाची सोडत निवडणूक झाल्यानंतर होणार असल्यामुळे यंदाच्या निवडणुका चागंल्याच चुरशीच्या होतायत. यावर्षी जागा महिलेला सुटणार की पुरुषाला याची माहिती उमेदवारांना नाही. एवढे सारे बदल झालेले असले तरी या निवडणुकांत महिलांचे स्थान काय हा जुनाच प्रश्न नव्याने उभा राहतोय. ज्या जागांवर महिला उभी राहिलेली आहे; तिच्या प्रचारासाठी तिचा मुलगा, पती किंवा वडील मागे उभाच आहे. प्रचारासाठी लावलेल्या बॅनर्सवरही तेच दिसतेय. त्यामुळे नावापुरतंच महिलेला प्रतिनिधीत्व देऊन गावाचा कारभार पुरुषच हाकणार का?, असा प्रश्न काही ठिकाणी उभा राहतोय. याला काही अपवादही आहेत. सातारा तालुक्यातील अंगापूर तर्फ तारगावच्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. येथे गावाचा कारभार महिलांच्या हाती देण्याचा ऐतिहासिक निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत झालाय.

15 जानेवारीला मतदान

राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान; तर 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते; परंतु कोविड-19 ची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

दरम्यान, गावाच्या राजकाराणाचा पोत बदलला असला तरी गावाचं गावपण जपलं जावं, अशी अपेक्षा संवेदनशील मन असणाऱ्यांकडून व्यक्त होतेय. स्थानिक पातळीवर निवडणूक होत असल्यामुळे गावात छोटछोट्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या होऊन बसतात. निवडणूक जिंकण्याची अहमहमिका आणि पराभवाची सल बोचू लागली की कित्येकांची मैत्री, कित्येकांच्या नात्यांमध्ये दुरावा झाल्याची उदाहरणं खेड्यांमध्ये आजही पाहायला मिळतात. कुठे भांडण-तंट्यालाही तोंड फुटतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर शेवटी ‘निकाल’ काहीही आला तरी गावाचं गावपण, भावकीतला भावपना टीकून राहावा अशी अपेक्षा गावच्या सुशिक्षितांकडून व्यक्त होतेय. आजही पारावर बसून म्हाताऱ्या बापुड्यांच्या जगराहाटीच्या गप्पा कुठल्याही आकसावीना व्हाव्यात. एकमेकांमध्ये जुनीच आपुलकी शाबूत राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संबंंधित बातम्या :

चंद्रकांत पाटलांच्या गावात आघाडीत बिघाडी, थेट अजित पवारांनी घेतली दखल, म्हणाले…

सिमला मिर्ची पिकवणाऱ्या पडसाळीने घडवला इतिहास! स्थापनेपासून पहिल्यांदाच ग्रामपंचायत बिनविरोध

(special story campaign method in gram panchayat election has been changed in 2021)

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.