Vastu Shastra : पितृदोषापासून मिळेल कायमची मुक्ती, करा वास्तुशास्त्रात सांगितलेले हे सोपे उपाय
अनेकदा आपल्याला आपल्या आयुष्यात अचानक काही अडचणींचा सामना करावा लागतो. घरात काहीही कारण नसताना वादविवाद वाढतात. अशा प्रकारची संकट पितृदोषामुळे देखील निर्माण होतात. आज आपण पितृदोष मुक्तीसाठी वास्तुशास्त्रात सांगितलेले काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत.

तुम्हालाही कधीतरी असा अनुभव आला असेल की सर्व सुरळीत सुरू असताना तुमच्यावर अचानक एखादं मोठं सकंट आलं, किंवा तुमचं आर्थिक नुकसान झालं. व्यवसायामध्ये तोटा होतोय. घरात काहीही कारण नसताना दररोज भांडणं होतात, त्यामुळे घर अशांत राहतं? तर मग ही सर्व पितृदोषाची लक्षणं आहे. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जेव्हा पितृदोष निर्माण होतो, तेव्हा त्याचं आयुष्य अस्थिर बनतं. पितृदोष दूर करण्यासाठी आणि आपल्या पितरांच्या शांतीसाठी वास्तुशास्त्रात विविध उपाय सांगण्यात आले आहेत. सर्व प्रथम पितृदोष कधी निर्माण होतो? हे समजून घेतलं पाहिजे. जेव्हा कुंडलीमध्ये सूर्य, राहू किंवा केतू आणि शनी यांची नवव्या किंवा दहाव्या स्थानी युती होते, तेव्हा कुंडलीमध्ये पितृदोष आहे, असं समजावं.
पितृदोष नेमका कशामुळे निर्माण होतो?
पितृदोष निर्माण होण्याची अनेक कारणे आहेत, ज्यामध्ये मृत्यूनंतर आपल्या पूर्वजांचे अंत्यसंस्कार योग्य पद्धतीने न करणं. तसेच वर्षातील दोन दिवस हे आपल्या पूर्वजांच्या स्मरणाचे असतात. त्यालाच आपण श्राद्ध आणि पक्ष असं म्हणतो. पक्ष हे पितृ पंधरवाड्यात घातले जातात. तर श्राद्ध दरवर्षी ज्या तिथीला संबंधित व्यक्तीचं निधन झालं आहे, त्या तिथिला घातलं जातं. जर आपण श्राद्ध आणि पक्ष घालत नसू तरी देखील घरात पितृदोष निर्माण होतो. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा आपण नागाला मारतो तेव्हा देखील पितृदोष निर्माण होतो.वड किंवा पिंपळाचं झाड तोडलं किंवा एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला असेल तरी देखील घरात पितृदोष निर्माण होण्याची शक्यता असते. गर्भपातामुळे देखील पितृदोष निर्माण होतो.
पितृदोषाची लक्षणं
जर तुमच्या घरात पितृदोष निर्माण झाला असेल तर त्याचा प्रत्यय तुम्हाला अनेक गोष्टींमधून येतो. काहीही कारण नसताना तुमच्या घरात सतत भांडण होतात, घरात पैसा टिकत नाही. आर्थिक स्थैर्य मिळत नाही. घरात विविध आजार येतात. व्यवसायामध्ये तोटा होतो. माणूस कर्जबाजारी होतो, अशी अनेक लक्षणं पितृदोषाची असतात.
उपाय
जर तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर तुम्ही दररोज पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा माराव्यात. 11 ते 108 अशा तुम्ही कितीही प्रदक्षिणा मारू शकता. त्याप्रमाणे दररोज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. आपल्या एखाद्या मृत पूर्वजाचा काही विधी राहिला असेल तर तो करावा. तसेच आपल्याला शक्य असेल तेवढे दान करावे, या उपायामुळे घरातील पितृदोष नाहीसा होतो आणि तुमची त्रासातून मुक्तता होते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
