आता सरकार बदलायचंय, आगीत भस्म…उद्धव ठाकरेंचा निर्धार, वांगचूक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा!
हे सरकार आपल्याला रोजी रोटी देऊ शकत नाही, रोजगार शिक्षण देत नाही. उत्तर देत नाही. हे सरकार बदलण्याचा लढा सुरू झाला पाहिजे, अशी भूमिका यावेळी ठाकरे यांनी मांडली.

Uddhav Thackeray Protest : दिल्लीमध्ये सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. त्यांना दिल्लीच्या रुग्णालयात सध्या दाखल करण्यात आले आहे. दिल्लीच्या आंदोलनस्थळी आता कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके हे अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. त्यांना दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे. मुंबईतही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाचे आयोजन केले. या आंदोलनात लोकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सोनम वांगचूक यांच्या आंदोलनला जाहीर पाठिंबा दिला. तसेच त्यांनी भाजपा आणि केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारला लक्ष्य केलं. हे सरकार आता घालवलं पाहिजे, असंही यावेळी ते म्हणाले.
सोनम वांगचूक, अभिजित दीपके यांच्या समर्थनार्थ घोषणा
मुंबईत आझाद मैदानात आयोजित केलेल्या या आंदोनलाला ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे तसेच अन्य महत्त्वाचे नेते उपस्थित होते. आंदोलनस्थळी सोनम वांगचूक, अभिजित दीपके यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. तसेच यावेळी ठाकरे यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारवर सडकून टीका केली. भाषणात बोलताना, मी आताच एक पोस्टर पाहिलं. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, असं त्यात लिहिलं होतं. राजीनामा ही शुल्लक गोष्ट आहे. केंद्रातील मोदी सरकार आपल्याला रोजी रोटी देऊ शकत नाही, रोजगार शिक्षण देत नाही. उत्तर देत नाही. हे सरकार बदलण्याचा लढा सुरू झाला पाहिजे, असं परखड मत ठाकरे यांनी व्यक्त केलं.
ही आग सरकार बदलेपर्यंत टिकली पाहिजे
तसेच, धर्मेंद्र प्रधान नको. सरकारच बदलायचं आहे. मी नेतृत्व करायला आलो नाही. नेते व्हा सांगायला आलो आहे. ही आग सरकार बदलेपर्यंत टिकली पाहिजे. सरकार टिकता कामा नये, या आगीत सरकार भस्म झालं पाहिजे. हा लढा फक्त वांगचुक यांचा नाही, असं म्हणत त्यांनी सरकारविरोधात व्यापक लढा उभा करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच सत्ता भ्रष्टांना बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. ही शपथ घेऊन आंदोलनाला सुरुवात करूया, असं आवाहनही त्यांनी जनतेला केलं.
