AUS vs BAN: ऑस्ट्रेलियाने वनडेची भरपाई टी20 मालिकेत केली, तिसऱ्या सामना होण्यापूर्वीच सीरिज खिशात
ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील दोन सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाने ही मालिका खिशात घातली आहे. दुसर्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 7 धावांनी विजय मिळवला.

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी20 सामन्यात बांगलादेशला 7 धावांनी पराभूत केलं आणि मालिका 2-0 ने जिंकली. दुसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 5 गडी गमवून 196 धावा केल्या आणि विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 20 षटकात 6 गडी गमवून 189 धावा करू शकला. शेवटच्या बांगलादेशला विजयासाठी 23 धावांची गरज होती. पण या षटकात 15 धावा आल्या आणि एक विकेट पडली. शेवटच्या चेंडूवर 8 धावांची गरज होती. त्यामुळे हा सामना गमावल्यातच जमा होता. पण या चेंडूवर षटकार मारला असता तर एका धावेने पराभव झाला असता. पण तौहिद हृदोयची विकेट पडली आणि सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला.
ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील सलग दोन सामन्यात विजय मिळवला. यासह मालिका 2-0 ने खिशात घातली. यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श म्हणाला की, ‘खूप छान वाटलं. अर्थातच, ही मालिका जिंकण्यासाठी आम्ही खूप उत्सुक होतो आणि दोन सामन्यांनंतरच ती पूर्ण करणे आमच्या संघासाठी खूप समाधानकारक आहे. (बांगलादेशच्या मागील दौऱ्याबद्दल विचारले असता) हो, मला वाटतं मागच्या वेळी स्कोअर 4-1 असा होता आणि आम्हाला जो एक विजय मिळाला तो खूप नशिबाने मिळाला होता. त्यामुळे, जिंकणं अर्थातच छान आहे, पण आमचा अजून एक सामना बाकी आहे. हो, आजची खेळपट्टी अर्थातच खूप चांगली होती, पण रेनशॉसाठी खूप आनंद झाला, विशेषतः टिम डेव्हिड सोबतची त्याची भागीदारी विलक्षण होती. ज्या प्रकारे त्यांनी आम्हाला एका बऱ्यापैकी अवघड परिस्थितीतून बाहेर काढले आणि मग वेग वाढवून आम्हाला एका खऱ्या अर्थाने स्पर्धात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचवले.’
बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-1 ने पराभूत केलं होतं. त्यामुळे त्या पराभवाची भरपाई ऑस्ट्रेलियन संघाने टी20 मालिकेत केली. टी20 मालिकेतील पराभवानंतर कर्णधार तौहिद हृदयोय म्हणाला की, ‘आम्ही खूप चांगला क्रिकेट खेळलो, पण काही क्षेत्रांमध्ये आम्हाला सुधारणा करण्याची गरज आहे. आम्हाला संघासाठी थोडी अधिक जबाबदारी सांभाळावी लागेल. (दोन षटकांत दोन विकेट गमावल्या) आम्ही खरं तर याचबद्दल बोलत आहोत, जेव्हा कधी ते स्थिरावतात, तेव्हा आम्हाला इथे एक मोठी खेळी करावी लागते. आतापर्यंत सर्व काही ठीक आहे, पण आम्हाला अशा प्रकारच्या सामन्यात पाठलाग करावाच लागेल, नाहीतर आम्ही ते करू शकत नाही. हो, आम्ही अंतिम सामन्यासाठी त्यावर काम करू.’
