IND vs SA: ..मग वॉशिंग्टन सुंदरला ओपनिंगला पाठवा! शुबमन गिलवर टीका करणाऱ्यांना कोचने दिलं उत्तर
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. खासकरून उपकर्णधार शुबमन गिल टीकाकारांच्या रडारवर आला आहे.

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील दोन सामन्यांचा खेळ संपला असून 1-1 अशी बरोबरी साधली आहे. दुसऱ्या टी20 सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला. पण निकालात बाजी दक्षिण अफ्रिकेने मारली. दुसर्या टी20 सामन्यात तिलक वर्मा वगळता इतर फलंदाजांनी सुमार कामगिरी केली. यात कर्णधार सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार शुबमन गिल यांचा खराब फॉर्म सुरूच आहे. शुभमन गिल पहिल्या सामन्यात 4 धावा करून बाद झाला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याला खातंही खोलता आलं नाही. संजू सॅमसनला बसवून त्याला संघात स्थान दिलं आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी शुबमन गिलच्या फॉर्मवर टीकेची झोड उठवली आहे. इतकंच काय तर पुढच्या सामन्यात शुबमन गिलला बेंचवर बसवण्याची मागणी केली. पण असं असताना गुजरात टायटन्सचा मुख्य प्रशिक्षक आशिष नेहराने कर्णधार शुबमन गिलची पाठराखण केली आहे.
आयपीएलच्या मागच्या दोन पर्वात शुबमन गिल आणि आशिष नेहरा या जोडीने एकत्र काम केलं आहे. त्यामुळे आशिष नेहराला त्याची पारख आहे. गिलच्या फॉर्मबाबत त्याला विचारलं गेलं. इतकंच काय तर आयपीएलसाठी 3 महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. त्यावर आशिष नेहराने सांगितलं की, ‘तीन महिने सोडा, आयपीएल तीन आठवड्यांनी असतं तरी मला चिंता नसती. कारण तुम्ही टी20 सारख्या फॉर्मेटची गोष्ट करत आहात. जर मी चुकीचा नसेल तर दक्षिण अफ्रिकेविरुद्ध फक्त दोनच सामने खेळले गेले आहेत.’
भारतात क्रिकेटपटूला त्याच्या आकडेवारीवरून गणलं जातं. तसेच त्यांच्यावर टीका केली जाते असं नेहरा पुढे म्हणाला. ‘हीच आमची समस्या आहे. या फॉर्मेटमध्ये जर शुबमन गिलसारख्या खेळाडूला एक दोन सामन्यात चांगलं प्रदर्शन केलं नाही म्हणून गणना केली जाईल तर ते कठीण होईल.’ इतकंच काय तर आशिष नेहराने त्याच्या शैलीत टीकाकारांना टोमणाही मारला. ‘तुमच्याकडे इतर पर्याय आहेत. तुम्हाला वाटत असेल तर अभिषेक शर्मा आणि शुबमन गिलला बाजूला करा. तुम्ही साई सुदर्शन आणि ऋतुराजकडून ओपनिंग करू शकता. त्यांनाही काढायचं ठरलं तर वॉशिंग्टन सुंदर आणि इशान किशनकडून डावाची सुरूवात करा. पर्याय खूप आहेत. पण एक दोन सामने हरल्यानंतर आकडे चांगले नसले की त्याला काढण्याची चर्चा होत असेल तर कठीण होईल.’
