AUS vs IND : टीम इंडियाकडे ऑस्ट्रेलियाचा हिशोब करण्याची संधी, ब्रिस्बेनमध्ये सूर्यासेना परतफेड करणार?
Australia vs India 5th T20i : टीम इंडियाने आतापर्यंत ब्रिस्बेनमधील द गाबा इथे एकमेव टी 20I सामना खेळला आहे. टीम इंडिया या मैदानात आपला दुसरा सामनाही ऑस्ट्रेलिया विरुद्धच खेळणार आहे. या सामन्यात भारताला कांगारुंचा हिशोब करण्याची संधी आहे.

सलग 2 सामने जिंकून मालिकेत आघाडी घेणाऱ्या टीम इंडियाकडे आता सीरिजवर नाव कोरण्याची सुवर्णसंधी आहे. भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 1-2 अशा फरकाने गमावली. त्यानंतर भारताची 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेतील सुरुवातही पराभवाने झाली. उभयसंघातील पहिला टी 20I सामना हा पावसामुळे वाया गेला. त्यामुळे मालिकेचा निर्णय 4 सामन्यांमधून लागणार असल्याचं स्पष्ट झालं. ऑस्ट्रेलियाने भारताला दुसऱ्या सामन्यात पराभूत करत मालिकेत विजयाचं खातं उघडलं. ऑस्ट्रेलियाने फक्त विजयच मिळवला नाही तर मालिकेत आघाडीही घेतली. त्यामुळे 0-1 ने पिछाडीवर असलेल्या भारतासमोर कमबॅक करण्याचं आव्हान होतं. टीम इंडियाच्या सूर्या ब्रिगेडने हे आव्हान यशस्वीरित्या पेललं.
हेड कोच गौतम गंभीर आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव जोडीने तिसऱ्या सामन्यासाठी रणनिती आखली. ही रणनिती यशस्वी ठरली. भारताने पहिल्या पराभवानंतर प्लेइंग ईलेव्हनमध्ये 3 बदल केले. या निर्णयामुळे अपेक्षित बदल पाहायला मिळाले. भारताच्या कामगिरीत कमालीचा बदल झाला. भारताने तिसरा आणि मालिकेतील आपला पहिला सामना जिंकला. भारताने या विजयासह मालिकेत 1-1 ने बरोबरी केली.
त्यानंतर गुरुवारी 6 नोव्हेंबरला भारताने कांगारुंसमोर 168 धावांचं आव्हान ठेवलं. भारताच्या फिरकी आणि वेगवान गोलंदाजांनी कमाल केली आणि ऑस्ट्रेलियाला 119 रन्सवर गुंडाळलं. भारताने अशाप्रकारे चौथ्या सामन्यात 48 धावांनी विजय नोंदवत मालिकेत 2-1 ने आघाडी मिळवली. भारताने यासह मालिका पराभव टाळला.
पाचव्या आणि अंतिम सामन्यात तिहेरी संधी
आता टीम इंडियाकडे पाचव्या सामन्यात विजय मिळवण्यासह एकूण तिहेरी कारनामा करण्याची संधी आहे. हा सामना ब्रिस्बेनमधील द गाबा इथे होणार आहे. भारताने याच मैदानात ऋषभ पंत याच्या झुंजार खेळीच्या जोरावर बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका जिंकली होती. आता याच मैदानात भारताकडे पाचव्या टी 20I सामन्यात कांगारुंचा हिशोब करण्याची संधी आहे.
भारताला मालिका जिंकण्यासाठी पाचवा सामना कोणत्याही स्थिती जिंकावा लागणार आहे. तसेच भारताकडे हा सामना जिंकून विजयाची हॅटट्रिक पूर्ण करण्याची संधी आहे. तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताला या मैदानात पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे.
टीम इंडिया कांगारुंचा हिशोब करणार?
भारताने या मैदानात 2018 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिलावहिला टी 20I सामना खेळला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं होतं. भारताकडे आता 7 वर्षांनी या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. त्यामुळे टीम इंडिया विजयी हॅटट्रिकसह मालिका जिंकत पराभवाचा हिशोब करणार का? हे सामन्याच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.
