IND vs NZ Final Toss : टॉस होताच टीम इंडियाचा वर्ल्ड कप विजय निश्चित! असा योग जुळून आला
T20i World Cup 2026 Final India vs New Zealand Toss Result and Playing 11 : टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात टीम इंडिया पहिले बॅटिंग करणार आहे. टीम इंडिया आता किती धावा करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टीम इंडिया सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात पहिल्यांदा आणि एकूण चौथ्यांदा आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी सज्ज झाली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 पर्वातील अंतिम सामन्यात यजमान टीम इडिया विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने आहेत. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये संध्याकाळी 7 वाजता महामुकाबल्यातील पहिला चेंडू टाकण्यात येणार आहे. त्याआधी 6 वाजून 34 मिनिटांनी नाणेफेक झाली. न्यूझीलंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. न्यूझीलंडचा कॅप्टन मिचेल सँटनर याने फिल्डिंगचा निर्णय घेत भारताला फलंदाजीसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडियाला बॅटिंगची संधी मिळताच पुन्हा एकदा योगायोग जुळून आला आहे. आतापर्यंत जेव्हा जेव्हा वर्ल्ड कप जिंकला आहे तेव्हा तेव्हा टीम इंडियाने महाअंतिम सामन्यात बॅटिंग केली होती. त्यामुळे यंदाही पहिले बॅटिंगमुळे टीम इंडियाच्या विजयाचा योग जुळून आल्याचा विश्वास चाहत्यांकडून वर्तवण्यात येत आहे.
न्यूझीलंडकडून एकमेव बदल
टीम इंडियाने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर न्यूझीलंडने 1 बदल केला आहे. जेकब डफी याचं संघात पुनरागमन झालं आहे. त्यामुळे कोल मॅककोन्ची याला बाहेर करण्यात आलं आहे.
टीम इंडियाची अहमदाबादमधील टी 20i क्रिकेटमधील कामगिरी
टीम इंडियाने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एकूण 10 टी 20i सामने खेळले आहेत. भारताने या 10 पैकी 7 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर भारताला 3 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलंय. तर न्यूझीलंडने या मैदानात 2 टी 20I सामने खेळले आहेत. न्यूझीलंडला या मैदानात खेळलेल्या दोन्ही सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे.
उभयसंघातील टी 20I वर्ल्ड कपमधील चौथा सामना
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील हा टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील चौथा सामना आहे. न्यूझीलंड भारतावर या स्पर्धेच्या इतिहासात वरचढ राहिली आहे. न्यूझीलंडने भारताला तिन्ही सामन्यांत पराभूत केलं आहे. त्यामुळे आता टीम इंडिया चौथ्या सामन्यात विजयाचं खातं उघडत वर्ल्ड कप ट्रॉफी आपल्या नावावर करणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडियाचा 7 सामन्यांमध्ये विजय
टीम इंडियाने आतापर्यंत या 10 पर्वात जबरदस्त कामगिरी केली आहे. टीम इंडियाने अंतिम फेरीतपर्यंत 8 सामने खेळले आहेत. टीम इंडियाने या 8 पैकी 7 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुपर 8 फेरीत एकमेव सामना गमवावा लागला आहे.
न्यूझीलंडची कामगिरी
तर न्यूझीलंडनेही या पर्वात साखळी, सुपर 8 आणि सेमी फायनल असे एकूण 8 सामने खेळले आहेत. मात्र न्यूझीलंडला 8 पैकी 5 सामनेच जिंकता आले आहेत. न्यूझीलंडने सुपर 8 फेरीत 3 पैकी फक्त 1 सामनाच जिंकला. न्यूझीलंडचा पाकिस्तान विरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडला पराभूत व्हावं लागलेलं. तर न्यूझीलंडने सुपर 8 फेरीत एकमेव सामना जिंकून सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. न्यूझीलंडने सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत अंतिम फेरीत धडक दिली.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (विकेटकीपर),अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टीम सायफर्ट (विकेटकीपर), फिन ऍलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन आणि जेकब डफी.
