विराटच्या मार्गदर्शनानंतर रोहितचा शिलेदार फॉर्ममध्ये, 8 सामन्यांपासूनचा धावांचा दुष्काळ संपवला, टीम इंडियाच्या चाहत्यांना दिलासा
राजस्थानविरुद्धचा सामना संपल्यानंतर इशान किशन म्हणाला की, विराट कोहली आणि कायरन पोलार्ड यांच्याशी बोलल्यानंतर मी माझा गमावलेला आत्मविश्वास परत मिळवला.

दुबई : आयपीएलच्या 14 व्या हंगामातील 51 वा सामना मंगळवारी राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स (RR vs MI) या दोन संघामध्ये पार पडला. प्लेऑफमध्ये जाणाऱ्या चौथ्या संघाचं स्थान मिळवण्यासाठी महत्त्वाचा असणारा हा सामना जिंकत मुंबईने स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले आहे. तसेच गुणतालिकेतही झेप घेत थेट पाचवं स्थान मिळवलं आहे. (IPL 2021 Ishan Kishan credits Virat Kohli, Kieron Pollard for is comeback)
सामन्यात नाणेफेक जिंकत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजी निवडली. हा निर्णय मुंबईसाठी 100% बरोबर ठरला. मुंबईच्या गोलंदाजानी भेदक गोलंदाजी करत राजस्थानच्या संघाला अवघ्या 90 धावांवर रोखलं. ज्यामुळे मुंबईसमोर केवळ 91 धावांचे सोपे लक्ष्य होते. जे त्यांनी अवघ्या 8.2 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावत पूर्ण केले. यावेळी संघाचा सलामीवीर इशान किशनने धडाकेबाज असं अर्धशतक झळकावत मुंबईचा विजय सोपा केला.
किशनचं ‘कमबॅक’
विशेष म्हणजे आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील इशान किशनचं हे पहिलंच अर्धशतक आहे. यंदा स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासूनच इशान किशन एकेका धावेसाठी संघर्ष करताना दिसला आहे. त्यामुळे मागील सामन्यात त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान दिलं नव्हतं. तसेच क्रिकेट समीक्षकांनी त्याच्या टी-20 वर्ल्डकप संघातील समावेशावरही प्रश्नचिन्हं उपस्थित केली होती. कालच्या सामन्यात मुंबईने सलामीवीर आणि यष्टीरक्षक क्विंटन डीकॉकला विश्रांती देत किशनला यष्टीरक्षक आणि सलामीवीर म्हणून संघात स्थान दिलं. या कमबॅक सामन्यात किशनने शानदार अर्धशतक झळकावत फॉर्ममध्ये परतल्याचे सूचित केले.
91 धावांचं सोपं लक्ष्य पार करताना मुंबईचा सलामीवीर रोहितने चांगली सुरुवात केली. पण 22 धावा होताच चेतन सकारियाने त्याला बाद केलं. त्यानंतर सूर्यकुमारही 13 धावा करुन बाद झाला. मुस्तफिजूरने त्याची विकेट घेतली. पण इशान किशन मात्र एका बाजूने तुफानी फलंदाजी करतच होता. त्याने अवघ्या 25 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकार ठोकत 50 धावा केल्या आणि सोबतच मुंबईला अवघ्या 8.2 षटकांत विजय मिळवून दिला. या खेळीत इशानने पहिले सहा चेंडू डॉट (निर्धाव) खेळले होते. खेळपट्टीचा अंदाज आल्यानंतर किशनने पुढच्या 19 चेंडूत जोरदार फटकेबाजी करत अर्धशतक ठोकलं.
विराट-पोलार्डशी बोलल्यानंतर आत्मविश्वास परत मिळाला
सामना संपल्यानंतर इशान किशन म्हणाला की, विराट कोहली आणि कायरन पोलार्ड यांच्याशी बोलल्यानंतर मी माझा गमावलेला आत्मविश्वास परत मिळवला. या सामन्यापूर्वी आठ सामन्यांत अवघ्या 107 धावा करणारा इशान खराब फॉर्ममुळे काही सामन्यांबाहेर होता. त्याने काल जोरदार पुनरागमन केले. त्याने त्याच्या डावात सुरुवातीला दहा डॉट बॉल खेळल्यानंतर 25 चेंडूत नाबाद अर्धशतक झळकावले. तो 25 चेंडूत नाबाद 50 धावा करून परतला.
इशान म्हणाला कमबॅक करुन धावा जमवल्याचा आनंद आहे. आम्ही आधी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला तो योग्य होता कारण चेंडू बॅटवर नीट येत नव्हता. चढ -उतार हा खेळाचा भाग आहे. मी विराट भाई, हार्दिक भाई आणि कायरन पोलार्डशी बोललो ज्यामुळे माझा आत्मविश्वास परत आला. आता मला पुढील सामन्यात ही गती कायम ठेवायची आहे.
काय होती राजनीति?
राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यातील रणनीतीबाबत किशन म्हणाला, ‘आमची योजना होती की आम्ही शक्य तितके सरळ फटके खेळू. शॉट्स पुढच्या बाजूला मारावे लागतील आणि फलंदाजांनीही तेच केले. मला वाटतं चढ -उतार हा कोणत्याही खेळाडूच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग असतो. माझी तब्येतही ठीक नव्हती. गेल्या मोसमाप्रमाणेच बहुतेक फलंदाजांना धावा करता आल्या नाहीत. आम्हाला सपोर्ट स्टाफकडून चांगले सहकार्य मिळाले. मी आमचा कर्णधार (रोहित), विराट भाई, हार्दिक भाईशीसुद्धा बोललो. सर्वांनी मला मदत केली. मी केपीशी (कायरन पोलार्ड) देखील बोललो त्याने अनेक गोष्टी सोप्या करुन सांगितल्या. त्याने सांगितलं, तू जसा नेहमी खेळतोस तसाच खेळ, गेल्या हंगामातील तुझे व्हिडिओ पाहा. मी माझ्या फलंदाजीचे काही व्हिडिओ पाहिले आणि त्यातून आत्मविश्वास मिळाला.
इतर बातम्या
(IPL 2021 Ishan Kishan credits Virat Kohli, Kieron Pollard for is comeback)
