Hardik Pandya: हार्दिक पांड्याच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, मुंबई इंडियन्स संघातून पत्ता कट?
आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या मैदानात उतरला नव्हता. दुखापतीचं कारण देत सूर्यकुमार यादवने कर्णधारपद भूषवलं होतं. आता हार्दिक पांड्याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सचं प्लेऑफचं गणित विस्कळीत झालं आहे. आतापर्यंत स्पर्धेत एकूण 10 सामने खेळले असून त्यापैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सचे गुणतालिकेत 6 गुण असून नेट रनरेट हा -0.649 आहे. तसं पाहिलं तर चार सामन्यात विजय मिळवला तरी 14 गुण होतील आणि प्लेऑफमध्ये जागा मिळवणं कठीण आहे. पण एखादा चमत्कार घडला तर गणित सुटू शकतं. म्हणजेच सर्व काही जर तर वर अवलंबून आहे. असं सर्व असताना 11व्या सामन्यापूर्वी हार्दिक पांड्याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. हार्दिक पांड्या आरसीबीविरुद्ध खेळणं कठीण आहे. कारण मुंबई इंडियन्स संघासोबत रायपूरला गेला नाही. या ठिकाणी आरसीबी आणि मुंबई इंडियन्सचा सामना होणार आहे. हा सामना 10 मे रोजी होणार असून मुंबईचा संघ 6 मे रोजी दुपारी रायपूरला रवाना झाला आहे. या संघासोबत हार्दिक पांड्या नव्हता.
आयपीएल 2026 स्पर्धेत आरसीबीविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या संघासोबत असेल की नाही याबाबतही काही माहिती नाही. म्हणजेच या सामन्यातही मुंबई इंडियन्स संघाची धुरा सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर असण्याची शक्यता आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने सांगितलं होतं की, हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त आहे. पण क्रीडावर्तुळात भलतीच चर्चा रंगली आहे. हार्दिक पांड्याच्या कामगिरीने मुंबई इंडियन्स व्यवस्थापन खूश नाही. त्यामुळे त्याचा संघातून पत्ता कापल्याची चर्चा आहे. पण या फक्त सोशल मीडियावरच्या चर्चा आहेत. दरम्यान, हार्दिक पांड्या आणि गर्लफ्रेंड माहिका मुंबईत एकत्र दिसले होते.
Hardik Pandya is in Mumbai, and last night he was seen in his Ferrari car with his girlfriend. pic.twitter.com/VAGhcTf19d
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) May 6, 2026
हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्ससाठी एकूण 8 सामने खेळले आणि 20.8 च्या सरासरीने 146 धावा केल्या. या स्पर्धेत आतापर्यंत त्याने फक्त 4 षटकार मारले. गोलंदाजीत त्याची हवी तशी छाप पडली नाही. त्याने 8 सामन्यात फक्त 4 विकेट घेतल्या आहेत. तसेच 11.9 च्या इकोनॉमी रेटने धावा दिल्या आहेत. कर्णधारपद भूषवतानाही त्याचे काही निर्णय चुकल्याचं दिसून आलं आहे. गोलंदाजांचा योग्य वापर करण्यास अपयशी ठरल्याचा ठपका मुंबई इंडियन्सच्या क्रीडाप्रेमींनी ठेवला आहे. आता हार्दिक पांड्याचं मुंबई इंडियन्ससोबतचा पुढचा प्रवास कसा आहे, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
