IPL 2026: पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत अपडेट, CSK विरूद्ध खेळणार की नाही?
आयपीएल 2026 स्पर्धेतील सातवा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होणार आहे. या सामन्यात पंजाब किंग्सच्या चाहत्यांची धाकधूक वाढली आहे. कारण मागच्या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती. आता खेळणार की नाही? याबाबत साशंकता आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी अनेक फ्रेंचायझींना खेळाडूंच्या दुखापतीचा फटका बसला आहे. त्यामुळे काही फ्रेंचायझींना ऐनवेळी पर्याय शोधण्याची वेळ आली. इतकंच काय तर सनरायझर्स हैदराबादला कर्णधार बदलावा लागला. असं असताना स्पर्धा सुरू असताना पंजाब किंग्सची धाकधूक वाढली होती. पंजाब किंग्सने आयपीएल 2026 स्पर्धेत विजयी सुरूवात केली. पहिल्या सामन्यात रडत रखडत का होईना गुजरात टायटन्सला पराभूत केलं. खरं तर विजय हा आनंदाचा भाग असतो. पण पंजाब किंग्सचं टेन्शन वाढलं होतं. कारण पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला या सान्यात दुखापत झाली होती. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात खेळेल की नाही याबाबत साशंकता होती. श्रेयस अय्यरच्या हाताला जोरात चेंडू लागला होता. त्यामुळे वेदनेने कळवळला होता. त्यामुळे त्याच्या हाताचं स्कॅनिंग करावं लागलं. पण रिपोर्ट येताच पंजाब किंग्सच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. पीटीआयच्या माहितीनुसार, स्कॅनिंगमध्ये त्याला फार काही दुखापत झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
श्रेयस अय्यरला दुखापत कधी झाली?
आयपीएल 2026 स्पर्धेत श्रेयस अय्यरला गुजरात टायटन्सविरुद्ध फलंदाजी करताना दुखापत झाली होती. डावाच्या 12 षटकात फिरकी गोलंदाज राशिद खान गोलंदाजी करत होता आणि स्ट्राईकला कूपर कोनोली होता. त्याने राशिदच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार केला. हा चेंडू सरळ नॉन स्ट्राईकला उभ्या असलेल्या श्रेयस अय्यरच्या दिशेने गेला. जोरदार प्रहार केल्याने त्याला जागेवरून हलण्याची संधी मिळाली नाही. हा चेंडू त्याच्या मनगटावर जोरात लागला. त्यामुळे श्रेयस अय्यर दुखापतीने कळवळला. त्यानंतर वैद्यकीय टीम मैदानात आली होती. स्प्रे वगैरे केल्यानंतर श्रेयस अय्यरने खेळ सुरू ठेवला. पण फार काळ मैदानात तग धरू शकला नाही. श्रेयस अय्यर 11 चेंडूत 18 धावांची खेळी करून बाद झाला.
गुजरात विरूद्धचा सामना संपल्यानंतर श्रेयस अय्यरने आपल्या दुखापतीबाबत अपडेट दिले होते. श्रेयस अय्यरने तेव्हा सांगितलं होतं की, ‘मी एवढेच सांगू शकतो की सर्व काही ठीक आहे. पूर्वीसारखेच आहे. काहीही बोलून मला माझे नशीब आजमावायचे नाही. मला सकारात्मक राहायचे आहे आणि आशा आहे की सर्व काही ठीक होईल.’ श्रेयस अय्यर पुढे म्हणाला होता की, “खरं सांगायचं तर, मी आत माझ्या हातावर लक्ष केंद्रित करून त्याला बर्फ लावत होतो. मग अचानक आमच्या एकापाठोपाठ दोन विकेट पडल्या. आयपीएलमध्ये असं घडतंच, आणि तुम्हाला शांत व संयमी राहावं लागतं.”
