RCB vs DC: पराभवानंतर काय चुकलं रजत पाटीदारने सांगितलं, तर केएल राहुलने अक्षरची बाजू मांडली
आयपीएल 2026 स्पर्धेतील 26व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीला 6 विकेट राखून पराभवाची धूळ चारली. या सामन्यात आरसीबीने विजयासाठी 176 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान दिल्लीने 19.5 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं.

आयपीएल 2026 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात आरसीबीने 20 षटकात 8 गडी गमवून 175 धावा केल्या. तसेच विजयासाठी 176 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान दिल्ली कॅपिटल्सने 19.5 षटकात चार गडी गमवून पूर्ण केलं. यासह दिल्ली कॅपिटल्सने स्पर्धेतील तिसऱ्या विजयाची नोंद केली. दिल्ली कॅपिटल्सने हा सामना जिंकून टॉप 4 मध्ये एन्ट्री मारली आहे. तर आरसीबीचं नंबर 1 होण्याचं स्वप्न या पराभवामुळे भंगलं आहे. आरसीबीला 8 गुणांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. या सामन्यातील पराभवानंतर आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याने बाजू मांडली. संघाचं काय चुकलं आणि पराभवाला काय कारण ठरलं हे त्याने सामन्यानंतर सांगितलं. हा सामना अतितटीचा होता, पण फलंदाजीत चुका केल्याचं त्याने सामन्यानंतर सांगितलं.
रजत पाटीदार म्हणाला की, सामना अगदी जवळ आला होता. मला वाटतं की आम्ही 15-20 धावांनी कमी पडलो.आम्ही सुरुवात चांगली केली, विशेषतः विराट कोहली आणि सॉल्टने चांगली सुरुवात करून दिली. पण तिथून पुढे 12-13 षटकांनंतर, आम्ही काही विकेट गमावल्या आणि त्यामुळे आम्ही मागे पडलो. मला वाटतं की पहिल्या डावात खेळपट्टी थोडी लयीत होती, असं मी म्हणेन. पण मला वाटतं की ज्याप्रकारे आम्ही शेवटच्या षटकात धावा वाढवल्या, ते आमच्यासाठी एक सकारात्मक चिन्ह आहे. मी गोलंदाजांशी चर्चा करत होतो की तुम्ही जे काही कराल ते स्पष्ट ठेवा. ही एक मोठी स्पर्धा आहे, पण मला वाटतं की आम्ही मागे जाऊन आत्मपरीक्षण करू की आमच्याकडून कुठे चुका झाल्या आणि आम्ही त्या सुधारू.
अक्षर पटेलला दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडून गेला. त्यामुळे प्रभारी कर्णधार म्हणून केएल राहुलने संघाची बाजू मांडली. केएल राहुल म्हणाला की, स्टब्स आणि मिलर यांच्यावर विश्वास होता. ते दक्षिण आफ्रिका आणि फ्रँचायझी क्रिकेटसाठी रोज हे करतात. त्यामुळे, आम्हाला हेही माहीत होतं की शेवटची दोन षटकं आरसीबीसाठी जुगार असणार आहे. आम्हाला हेही माहीत होतं की कदाचित रोमारियो शेफर्ड किंवा सुयश शर्मा गोलंदाजी करतील. आमच्या फलंदाजांना शेवटच्या दोन षटकांत दोन षटकार मारण्याची चांगली संधी मिळाली. खरंतर सामना 20व्या षटकापर्यंत जावा असं आम्हाला वाटलं नव्हतं, पण आम्ही हा विजय स्वीकारतो.