‘माझं काही पर्सनल नातं नाही,पण…’, हार्दिक पांड्याच्या एका निर्णयावर आर अश्विन भडकला
आयपीएल 2026 स्पर्धेत सर्वात सुमार संघ म्हणून मुबंई इंडियन्सची गणती होत आहे. कारण या स्पर्धेत दोन विजय सोडले तर, इतर सामन्यात पराभवाची मालिका सुरू आहे. त्यात चेन्नई सुपर किंग्सविरुद्धचा सामना मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पांड्यासाठी खूपच वाईट गेला.

R Ashwin Criticises Hardik Pandya: मुंबई इंडियन्सची आयपीएल 2026 स्पर्धेत हाराकिरी सुरूच आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची कामगिरी उंचावेल असं वाटत होतं, पण त्याच्या अगदी उलट होत आहे. आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सने कर्णधार बदलला आणि पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या संघाच्या कामगिरीत कमालीची घसरण झाली. मागच्या पर्वात त्यातल्या त्यात मुंबई इंडियन्सने चांगली कामगिरी केली होती. मात्र या पर्वात मुंबई इंडियन्सचं काहीच खरं दिसत नाही. त्यामुळे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर ताशेरे ओढले जात आहेत. असं असताना माजी क्रिकेट आर अश्विन यानेही हार्दिक पांड्याच्या एका निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे. नेमकं काय ते जाणून घ्या..
आर अश्विनचं संतापण्याचं कारण असं की, मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सविरूद्धच्या सामन्यात प्रथम गोलंदाजी स्वीकारली. या सामन्यात हार्दिक पांड्याने पहिल्या दोन षटकात 38 धावा दिल्या. जेव्हा डावाचं शेवटचं षटक टाकण्याची वेळ आली तेव्हा हार्दिक पांड्याने ही जबाबदारी ढकलली. शेवटचं षटक युवा कृष भगतच्या खांद्याव टाकली. त्याचा हा दुसरा सामनाच होता. त्याने पहिल्या षटकात 15 धावा दिल्या होत्या. त्यामुळे त्याच्याकडे शेवटचं षटक सोपवलं जाईल याची जराही कल्पना नव्हती. हार्दिक पांड्याचा हा निर्णय चुकीचा ठरला आणि त्याने शेवटच्या षटकात 16 धावा दिल्या.
आर अश्विनने आपल्या युट्यूब व्हिडीओ हार्दिक पांड्याच्या या निर्णयावर आक्षेप नोंदवला आणि सांगितलं की, ‘हार्दिक पांड्याशी माझं काही वैयक्तिक नातं नाही. मी त्याला नेहमीच एक महान खेळाडू मानतो. पण यावेळी त्याच्याबाबत बोलणं सोपं आहे, कारण त्याने शेवटचं षटक कृष भगतच्या हाती सोपवलं. मला वाटतं की पांड्याने पहिल्या दोन षटकात 38 धावा दिल्या होत्या. जर तो टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात डेविड मिलरसमोर षटक टाकू शकतो, तर तो यावेळीही तसंच करू शकला असता.’
आर अश्विनने कृष भगतबाबत आपलं मत व्यक्त करताना सांगितलं की, ‘कृषजवळ फार अनुभव नाही. त्याने खूप काही चुकीचं केलं असं नाही. मला त्याची गोलंदाजी आवडली. पण पांड्या हा दबाव त्याच्यावर घेऊ शकला असता. जास्तीत जास्त काय झालं असतं?’
