संजू सॅमसनच्या नाबाद 97 धावांच्या बरोबरीत ते दोन चौकार, गौतम गंभीरने अशी तुलना करण्याचं कारण की…
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने धडक मारली आहे. पण येथे पोहोचण्यासाठी टीम इंडियाला वेस्ट इंडिजचं कठीण आव्हान पेलावं लागलं. या सामन्यात संजू सॅमसनची खेळी उल्लेखनीय राहिली. पण गौतम गंभीरने त्याच्या खेळीचं दोन चौकारांसोबत तुलना केली आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत टीम इंडियाला कठीण आव्हानाला सामोरं जावं लागलं. वेस्ट इंडिजने 196 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारतीय संघाने गाठलं. पण ते गाठणं सोपं नव्हतं हे देखील तितकंच खरं आहे. संजू सॅमसनने विजयी चौकार मारत संघाला विजय मिळवून दिला. त्याच्या नाबाद 97 धावांच्या खेळीमुळे हा विजय शक्य झाला. या खेळीसाठी त्याचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी त्याच्या खेळीवर स्तुतीसुमनं उधळली. या कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. असताना पत्रकार परिषदेत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने संजू सॅमसनच्या 97 धावांची बरोबरी दोन चौकारांसोबत केली आहे. शेवटी फलंदाजीला येऊन शिवम दुबेने दोन चौकार मारले होते. त्यामुळे टीम इंडियाचा विजयाचा मार्ग सोपा झाला होता, असं प्रशिक्षक गौतम गंभीर याने सांगितलं.
‘मला वाटतं की माझ्यासाठी शिवम दुबेचे दोन चौकार संजू सॅमसनच्या 97 धावांइतकेच महत्त्वाचे आहेत. कारण जर त्याने चौकार मारले नसते. तर कदाचित त्या 97 धावांबाबत चर्चाही झाली नसती. यासाठी त्याचं छोटसं योगदान खूपच महत्त्वाचं होतं. हा सांघिक खेळ आहे आणि कायम संघ खेळ राहील.’, असं प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाला. आकड्यांबाबत बोलताना गौतम गंभीरने आपलं रोखठोक मत मांडलं. ‘खरं सांगायचं तर मला आकड्यांवर विश्वास नाही. मी कधीच आकडे पाहात नाही. मला माहिती नाही की आकडे काय असतात. मी त्यावर जराही विश्वास ठेवत नाही. कारण मला वाटतं की ते फार तर सहज ज्ञानावर आधारित असतात.’, असं गौतम गंभीर म्हणाला.
उपांत्य फेरीबाबत गौतम गंभीर म्हणाला…
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. हा सामना 5 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याबाबत गौतम गंभीर म्हणाला की, ‘इंग्लंडचा संघ एक वर्ल्ड क्लास संघ आहे. त्यांच्याकडे चांगले खेळाडू आहेत. आम्हाला माहिती आहे की वानखेडेवर खेळणं वाटतं तितकं सोपं नाही. आशा आहे की आम्ही चांगली कामगिरी करू.’
