IND vs PAK: टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानची धुलाई करण्यासाठी खास प्लान, तिलक वर्माने सर्व सांगून टाकलं
Tilak Varma on IND vs PAK: टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार? वगैरे चर्चा सुरू आहेत. असताना भारताचा स्टार फलंदाज तिलक वर्माने या सामन्यापूर्वी खास तयारीबाबत सांगितलं आहे.

India vs Pakistan: टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना 15 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यात होत आहे. हा सामना तटस्थ ठिकाणी म्हणजेच कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे. बऱ्याच वाद प्रतिवादानंतर हा सामना होत आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. भारताने नामिबियाविरूद्धचा सामना जिंकल्यानंतर या सामन्यात वर्चस्वाची लढाई असेल. कारण दोन्ही संघांचे प्रत्येकी 4 गुण असतील आणि विजेत्या संघाच्या पदरात 2 गुण पडल्यास 6 गुण होतील. त्यामुळे हा सामना रोमहर्षक होणार यात काही शंका नाही. त्यामुळे भारत पाकिस्तान या दोन्ही संघांवर दडपण असणार आहे. असं असताना भारतीय संघाने या सामन्यासाठी खास तयारी केली आहे. याबाबत स्टार फलंदाज तिलक वर्माने खुलासा केला आहे. दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात नामिबियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यापूर्वी तिलक वर्मा पत्रकार परिषदेला सामोरं गेला.
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धचा सामना समोर असल्याने पत्रकारांनी हाच धागा पकडला. या सामन्याबाबत तिलक वर्माला थेट प्रश्न विचारला गेला. पाकिस्तानचा हा सामना खेळण्यास नकार होता. त्यानंतर बराच काळ गेला. सामना होणार की नाही याबाबत स्पष्टता नव्हती. तेव्हा तू आणि टीम इंडिया काय विचार करत होती? पाकिस्तानचा विचार करून तयारी सुरू होती का? या प्रश्नावर तिलक वर्माने सांगितलं की, आम्ही पाकिस्तानसोबत खेळण्यास तयार होतो. दोन दिवसापूर्वीच आम्हाला कळलं की खेळायचं आहे. पण आम्ही लोकं पहिल्यापासून सज्ज होतो. तसेच आम्ही आताही तयारी करत आहोत.
तिलक वर्माने पुढे स्पष्ट केलं की, आमचं लक्ष्य फक्त पाकिस्तान नाही तर त्यांच्या संपूर्ण संघाच्या कामगिरीवर आहे. कोण कसं खेळत आहे? आम्ही त्यांच्यावर नजर ठेवून आहोत. भारतीय संघाचे फलंदाज पाकिस्तान आणि इतर संघाच्या गोलंदाजांवर लक्ष ठेवून आहेत. दुसरीकडे, आमचे गोलंदाज इतर फलंदाज काय करत आहेत याचा अभ्यास करत आहेत. त्यामुळे तयारी सुरूच आहे. आम्ही पाकिस्तानविरूद्ध खेळण्यास तयार आहोत.
तिलक वर्माची पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी आहे. त्याने तीन टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 130 धावा केल्या आहेत. यात त्याचा नाबाद 69 ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्याने तीन विकेटही घेतले आहेत. आता तशाच कामगिरीची अपेक्षा त्याच्याकडून क्रीडाप्रेमी करत आहेत.
