वैभव सूर्यवंशीला लागणार आणखी मोठी लॉटरी? माजी कर्णधारानेच सांगून टाकलं; कसोटी क्रिकेटमध्ये…
वैभव सूर्यवंशीने व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पण वैभव रेड बॉल क्रिकेट खेळण्यास परिपक्व आहे का? यावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉने भाष्य केलं आहे.

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर असून दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवण्याच्या वेशीवर आहे. दुसरीकडे, भारताचा उदयोन्मुख स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणासाठी मेहनत घेत आहे. रेड बॉल क्रिकेटमध्ये छाप पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे. बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेत ईस्ट झोन संघातून खेळत आहे. इतकंच काय तर त्याच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची धुराही सोपवण्यात आली आहे. पण या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात त्याला फलंदाजीत फार काही चांगली कामगिरी करता आली नाही. नॉर्थ ईस्ट झोनविरुद्धच्या पहिल्या क्वॉर्टर फायनलमध्ये 8 धावा करून बाद झाला. पण गोलंदाजीत त्याने आपली छाप सोडली. एकाच षटकात 2 महत्वाचे विकेट काढले आणि ईस्ट झोनच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. असं असताना ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉने वैभव सूर्यवंशीवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. वैभव सूर्यवंशीमध्ये कसोटी पदार्पणाच्या सामन्यात शतक ठोकण्याची ताकद आहे, असं स्टीव्ह वॉ म्हणाला.
वैभव सूर्यवंशीबाबत काय म्हणाला स्टीव्ह वॉ?
स्टीव्ह वॉ स्टार स्पोर्ट्सवर म्हणाला की, ‘वैभव सूर्यवंशीमध्ये असामान्य प्रतिभा आहे. कसोटी क्रिकेट खेळण्यास सक्षम आहे. मला त्याबद्दल काहीही शंका नाही. पण भारतीय संघात त्याला इतक्या कमी वयात संधी मिळेल का? हा देखील प्रश्न आहे. पहिल्या कसोटी सामन्यात शतक ठोकू शकत नाही, असं कोणतंच कारणही दिसत नाही. त्याच्यात त्या स्तराची प्रतिभा आहे. पण कसोटी क्रिकेट त्यासाठी थोडं वेगळं असेल. त्याच्यासमोर वेगवेगळी आव्हानं असतील. खरं तर कसोटीत गोलंदाजांकडे गोष्टी वेगळ्या पद्धतीने करण्यासाठी अधिक वाव असतो. मला वाटते की त्याला प्रथम श्रेणी क्रिकेटचा अधिक अनुभव मिळावा. त्याला तीन चार दिवसांच्या क्रिकेटचा अनुभव असल्याशिवाय थेट कसोटी क्रिकेटमध्ये उतरवू इच्छिणार नाहीत.’
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वैभवची कारकीर्द कशी?
वैभव सूर्यवंशी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फक्त 9 सामने खेळला आहे. यात त्याच्या नावावर फक्त 215 धावा आहेत. 16.53 च्या सरासरीने त्याने या धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याला रेड बॉल क्रिकेटमध्ये आणखी काही काळ घाम गाळावा लागणार आहे. भारताचा माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सांगितलं की, वैभवमध्ये भारताकडून कसोटी सामना खेळण्याची प्रचंड क्षमता आहे. पण त्याला टी20 पलीकडे जाऊन देशांतर्गत रेड बॉल क्रिकेट खेळणं भाग आहे. यासाठी त्याला किमान 2 हंगाम खेळावे लागतील आणि तेव्हाच तो कसोटीसाठी तयार होईल.
