T20 WC 2026: सुपर 8 फेरीत पाकिस्तानची एन्ट्री, उपांत्य फेरीत भारताविरुद्ध होणार लढत? असं असेल गणित
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 चं चित्र स्पष्ट झालं आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ वेगवेगळ्या गटात आहे. पण उपांत्य फेरीत हे संघ भिडू शकतात. कसं काय ते समजून घ्या

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीचा थरार संपला आहे. कारण आता फक्त औपचारिक सामने शिल्लक राहिले आहे. सुपर 8 फेरीचे सर्व संघ ठरल्याने त्या सामन्यांच्या निकालाचा तसा काही फरक पडणार नाही. पाकिस्तानने नामिबियाला पराभूत केलं आणि सुपर 8 फेरीचं चित्र स्पष्ट झालं. पाकिस्तानने सुपर 8 फेरीत जागा मिळवताच त्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. आता सुपर 8 फेरीत कशी कामगिरी राहते? यावर पुढचं गणित ठरणार आहे. गट 1 आणि गट 2 असे दोन भाग पडले असून प्रत्येक गटात चार संघ आहे. गट 1 मधील संघ त्याच गटातील संघांशी लढत देणार आहे. प्रत्येक संघाच्या वाटेला तीन सामने येणार आहेत. गटातील टॉप 2 संघांना उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. गट 1 मध्ये भारत, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका आहेत. तर गट 2 मध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंका आहेत. भारताचे सामने वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे आणि दक्षिण अफ्रिकेशी होईल.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात साखळी फेरीत लढत झाली होती. तेव्हा दोन्ही संघ एकाच गटात होते. हा सामना भारताने 61 धावांनी जिंकला होता. आता सुपर 8 फेरीत भारत आणि पाकिस्तान हे संघ वेगवेगळ्या गटात आहेत. त्यामुळे सुपर 8 फेरीत आमनासामना होण्याचा प्रश्न येत नाही. पण गणित उपांत्य फेरीत जुळून येऊ शकते. जर भारतीय संघ गट 1 मध्ये पहिल्या स्थानावर आणि पाकिस्तानचा संघ गट 2 मध्ये दुसऱ्या स्थानावर राहिला, तर उपांत्य फेरीत सामना होऊ शकतो. पण तसं झालं नाही तर मग अंतिम फेरीत गणित जुळू शकतं. पण भारत पाकिस्तान या दोन्ही संघांना उपांत्य फेरीत विजय मिळवावा लागेल.
पाकिस्तानचा नामिबियावर 102 धावांनी विजय
पाकिस्तानने नामिबिया विरूद्धच्या सामन्यात 199 धावांची खेळी केली आणि 200 धावांचं लक्ष्य दिलं. नामिबियाचा डाव अवघ्या 97 धावांवर आटोपला. पाकिस्तानने या सामन्यात 102 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात साहिबजादा यांनी 58 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. तर नामिबियाला 100 पेक्षा कमी धावांवर रोखण्यात पाकिस्तानचा मिस्ट्री स्पिनर उस्मान तारिकने महत्त्वाची भूमिका बजावली. तारिकने 3.3 षटकांत 16 धावा देत 4 बळी घेतले. तर शादाब खानने 4 षटकांत 3 बळी घेतले.
