विराटकडून आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर मन मोकळं, होतं नव्हतं ते सर्व सांगितलं, पाहा व्हीडिओ
Virat Kohli Reaction : आरसीबीने आयपीएल ट्रॉफी जिंकावी, हे चाहत्यांचं आणि विराट कोहलीचं गेल्या 17 वर्षांपासूनचं स्वप्न होतं. आरसीबी याआधी आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरण्यापासून 3 वेळा अपयशी ठरली. मात्र 18 व्या हंगामात आरसीबीने इतिहास घडवला. आरसीबीच्या या ऐतिहासिक विजयांनतर विराट कोहली काय म्हणाला?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पंजाब किंग्सवर 6 धावांनी मात करुन आयपीएल 2025 ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. आरसीबीने पंजाबसमोर 191 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. मात्र पंजाबला 7 विकेट्स गमावून 184 रन्सच करता आल्या. आरसीबीची यासह गेल्या 17 वर्षांची आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची प्रतिक्षा संपली. आरसीबीच्या या विजयानंतर विराट कोहली भावूक झाला. विराटने या ऐतिहासिक विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर मॅथ्यू हेडन यांच्यासह संवाद साधला. विराटने या दरम्यान अनेक प्रश्नांची उत्तर दिली. विराटने विजयानंतर पहिली प्रतिक्रिया काय दिली? त्याने या विजयाचं श्रेय कुणाला दिलं? तसेच विराटने ही ट्रॉफी कुणाला समर्पित केली? हे सर्व काही जाणून घेऊयात.
विराट काय म्हणाला?
‘हा विजय जितका टीमचा आहे तितकाच तो चाहत्यांचाही आहे. मी या संघाला माझं तारुण्य, उमेदीचा काळ आणि सर्वोत्तम दिलंय. प्रत्येक हंगामात जिंकण्याचा प्रयत्न केला. मी शक्य तितकं सर्व काही दिलं. हा दिवस येईल असं कधीच वाटलं नव्हतं. आम्ही जिंकल्यानंतर भावनेने भरून गेलो. एबीडीने (एबी डीव्हीलियर्स) फ्रँचायझीसाठी जे केलंय ते जबरदस्त आहे. हा विजय जितका तुमचा आहे तितकाच आमचा आहे, असं मी त्याला म्हटलं”असं विराटने म्हटलं.
“एबी निवृत्त होऊ 4 वर्ष झालीत. मात्र त्यानंतरही एबी आरसीबीसाठी सर्वाधिक वेळा मॅन ऑफ मॅच अवॉर्ड जिंकणारा खेळाडू आहे. एबी कप उचलण्यासाठी पोडीयमवर येण्यासाठी पात्र आहे. हा विजय वरच्या दर्जाचा आहे. मी आरसीबीसोबत एकनिष्ठ राहिलो. या दरम्यान अनेक गोष्टींचा सामना केला. मात्र त्यानंतरही मी टीमसोबत कायम राहिलो आणि ते माझ्यासोबत. माझं मनही बंगळुरूसोबत आहे, माझा आत्मा बंगळुरूसोबत आहे. मी आज रात्री लहान मुलासारखा झोपेन”, असंही विराटने म्हटलं.
आरसीबीसाठी विराटच्या सर्वाधिक धावा
विराट कोहलीने आरसीबीसाठी अंतिम सामन्यात सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. विराटने आरसीबीला 190 पर्यंत पोहचवण्यात प्रमुख भूमिका बजावली. विराटने 35 बॉलमध्ये 122.86 च्या सरासरीने 43 रन्स केल्या. विराटने या दरम्यान 3 चौकार लगावले. विराटने यासह रेकॉर्ड ब्रेकही केला. विराट आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक चौकार लगावणारा फलंदाज ठरला. विराटने याबाबतीत शिखर धवन याचा विक्रम मोडीत काढला.
विराटची पहिली प्रतिक्रिया
🗣🗣 My heart is for Bangalore, my soul is for Bangalore…this is the team I will play for until the last day that I play the IPL.
🎥 Virat Kohli, straight from the heart as a #TATAIPL champion ❤#RCBvPBKS | #Final | #TheLastMile | @imVkohli | @RCBTweets pic.twitter.com/4UI4yNKLuB
— IndianPremierLeague (@IPL) June 3, 2025
विराटची 18 व्या हंगामातील कामगिरी
दरम्यान विराटने 18 व्या मोसमातील 15 सामन्यांमध्ये 8 अर्धशतकांसह एकूण 657 धावा केल्या. विराट कोहली या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी राहिला.
