टीम इंडियाला कसोटी क्रिकेटमध्ये पुढे घेऊन जाण्यासाठी काय करावं? कर्णधार गिल म्हणाला..
शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा एकमेव कसोटी सामन्यात दारूण पराभव केला. अफगाणिस्तानला एक डाव आणि 300 धावांनी पराभूत केलं. या विजयानंतर टीम इंडिया पुन्हा कसोटीच्या विजयी ट्रॅकवर परतली आहे.

भारताने एकमेव कसोटी सामन्यात अफगास्तानचा दारूण पराभव केला. एक डाव आणि 300 धावांनी पराभवाची धूळ चारली. खरं तर हा सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग नव्हता. त्यामुळे गुणतालिकेत किंवा विजयी टक्केवारीवर काही एक परिणाम झाला नाही. पण पुढच्या सामन्यांसाठी या विजयामुळे बुस्टर मिळालं आहे. दक्षिण अफ्रिकेचा भारत दौरा शुबमन गिल आणि टीमसाठी वाईट गेला होता. या मालिकेत 2-0 ने मात खावी लागली होती. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित बिघडलं आहे. अशा स्थितीत आता उर्वरित सामन्यांपैकी सात ते आठ सामने जिंकणं भाग आहे. भारताचा कसोटीसाठी पुढचा दौरा श्रीलंकेत आहे. या दौऱ्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी मिळालेल्या विजयामुळे टीम इंडियाला बुस्टर मिळालं आहे. आता टीम इंडिया पुढच्या तयारीला लागणार आहे. दरम्यान, या विजयानंतर कर्णधार शुबमन गिल याने आपलं मत व्यक्त केलं.
सामन्यानंतर समालोचकाने कर्णधार शुबमन गिलला विचारलं की, संघाला पुढे नेण्यासाठी टीम आणि कर्णधार म्हणून तुम्हाला काय करण्याची गरज आहे? त्यावर शुबमन गिल म्हणाला की, ‘मी म्हणेन, हे अगदी सोपं आहे. जेव्हा तुम्ही पहिल्या डावात फलंदाजी करत असाल, तेव्हा प्रत्येक वेळी फलंदाजीला आल्यावर, आपण कुठेही खेळत असलो किंवा खेळपट्टीची परिस्थिती कशीही असली तरी, धावफलकावर 350 धावा करण्याचा प्रयत्न करा. मला वाटतं की आमच्या गोलंदाजी गटावर इतका विश्वास आहे की आम्ही कुठेही 20 बळी घेऊ शकतो. जेव्हा कधी स्थित्यंतर होते, तेव्हा आम्हाला वाटते की फलंदाजी गटावर अधिक दबाव येतो आणि आम्ही अनुभव मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. एक फलंदाजी गट म्हणून आणि वेगवेगळ्या परिस्थितीत आणि वेगवेगळ्या परिस्थितीत आमच्यासाठी कोणत्या प्रकारचा खेळ उपयुक्त ठरू शकतो, हे पाहण्यासाठी आम्ही इथे तयारी करत आहोत. आम्ही नियमितपणे धावफलकावर 350-400 धावांची धावसंख्या कशी कायम ठेवू शकतो.’
अफगाणिस्तानला फॉलोऑन देण्याचं कारण सांगताना शुबमन गिल म्हणाला की, ‘खूप उष्णता होती. आम्ही ठरवलं की, जर ते दुपारच्या जेवणाआधी किंवा पहिल्या ड्रिंक्सनंतर लगेच बाद झाले, तर गोलंदाज ताजेतवाने आहेत का हे पाहून आम्ही त्यांना फॉलो-ऑन देऊ. तसे नसल्यास, आम्ही दोन-तीन सत्रं फलंदाजी करू आणि कदाचित दिवसाच्या शेवटी पुन्हा त्यांना गोलंदाजी देऊ. पण आम्हाला झटपट विकेट्स मिळाल्या आणि आम्ही पुनरागमन केलं. आणि ज्या प्रकारे आमच्या वेगवान गोलंदाजांनी गोलंदाजी केली, जेव्हा आम्ही त्यांना फॉलो-ऑन दिला तेव्हा सिराजने आम्हाला ती महत्त्वाची विकेट मिळवून दिली आणि प्रसिद्धने तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.’
