Gautam Gambhir : भारताच्या वर्ल्ड कप विजयाचा आनंद बिघडवणाऱ्या किर्ती आझाद यांना गौतम गंभीरचं सडेतोड प्रत्युत्तर
Gautam Gambhir : भारताने सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकल्याने देशवासिय आनंदात आहेत. पण माजी क्रिकेटपटू आणि खासदार किर्ती आझाद यांनी एक स्टेटमेंट करुन नवीन वाद सुरु केलाय. त्यावर आता टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

तृणमुल काँग्रेसचे खासदार किर्ती आझाद यांनी धार्मिक स्टेटमेंट करुन भारताच्या टी20 वर्ल्ड कप विजयाचा आनंद खराब केला. त्यावर आता हेड कोच गौतम गंभीर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भारताने रविवारी फायनलमध्ये न्यूझीलंडला 96 धावांनी नमवलं. त्यानंतर कोच गंभीर, कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि आयसीसीचे अध्यक्ष जय शाह हे ट्रॉफी घेऊन जवळच्या हनुमान मंदिरात गेले. त्यावर किर्ती आझाद यांनी वक्तव्य केलं. ते स्वत: 1983 सालच्या भारताच्या पहिल्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे सदस्य आहेत. किर्ती आझाद यांनी एक्सवर पोस्ट केली. या पोस्टने वादळ आणलं. अशा स्टेटमेंटची गरज काय? असा प्रश्न अनेकांनी विचारला. काल इशान किशन आपल्या गृहराज्यात परतला. त्यावेळी विमानतळावर पत्रकारांनी त्याला या मुद्यावर प्रश्न विचारला. त्यावर त्याने या वादाला खतपाणी घालायचं नाही असं ठरवलं. तो एवढचं म्हणाला, अजून दुसरं काहीतरी विचारा.
“हा मूर्खपणा आहे. किर्ती आझाद यावरूनही राजकारण खेळण्याचा प्रयत्न करतायत का?. भारतीय टीम ही ट्रॉफी मंदिर, मशीद, चर्चा त्यांना वाटेल तिथे घेऊन जाईल. त्यांनी जर त्यांच्या देवाकडे काही मागितलं असेल आणि इच्छा पूर्ण झाल्यानंतर ते तिथे पुन्हा जात असतील, तर यात प्रॉब्लेम काय” असं हरभजन सिंह सरळ म्हणाला.
गंभीर काय म्हणाला?
टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर यांनी या वादावर मौन सोडलं आहे. ‘हे अपमानस्पद असून तुम्ही भारताच्या विजयाचं महत्व कमी करताय’ असं गौतम गंभीरने म्हटलं आहे. “मी यावर काय बोलू. या प्रश्नावर बोलणं सुद्धा योग्य नाही. हा सगळ्या देशासाठी मोठा क्षण आहे. आपण वर्ल्ड कप विजय साजरा करणं महत्वाचं आहे. म्हणूनच मी म्हटलं यशाचं महत्व कमी करणाऱ्या अशा वक्तव्यांवर बोलणं योग्य नाही. तुम्हाला त्या 15 खेळाडूंच्या मेहनतीचं महत्व कमी करायचं असेल, तर उद्या कोणीही उठेल काहीही म्हणेल” असं गंभीर एएनआयच्या पॉडकास्टमध्ये म्हणाला.
त्यांच्यावर किती मोठा दबाव होता
“कल्पना करा मुलं कुठल्या स्थितीतून गेली असतील. त्यांच्यावर किती मोठा दबाव होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना गमावल्यानंतर मुलांवर प्रचंड दबाव होता आणि तुम्ही अशी स्टेटमेंट करत असाल तर तुम्ही तुमच्या खेळाडूंचं, स्वत:च्या टीमचं महत्व कमी करताय. असं नाही झालं पाहिजे” असं गौतम गंभीर पॉडकास्टमध्ये म्हणाले.
