IPL 2026 Gujarat Titans : गुजरात टायटन्सच्या खेळाडूंच्या बसचा टळला मोठा अपघात, थोडक्यात वाचला जीव,अचानक..
IPL 2026 : गुजरात संघाच्या बसमध्ये शॉर्ट सर्किट झाले. मात्र, सर्व खेळाडूंना सुखरूप बाहेर काढण्यात आले. अंतिम सामन्यातील पराभवानंतर खेळाडू टीम हॉटेलकडे परतत असताना हा अपघात झाला.

GT Team Bus Accident : आयपीएल 2026 अंतिम सामन्यातील पराभवानंतर गुजरात टायटन्सचा संपूर्ण संघ एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावला. पीटीआयच्या वृत्तानुसार, अंतिम सामन्यानंतर संघ स्टेडियमवरून हॉटेलकडे परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली. नरेंद्र मोदी स्टेडियमवरून गुजरात टायटन्स संघातील खेळाडूंना हॉटेलकडे जात असताना संघाच्या बसला अचानक आग लागली आणि धूर पसरला. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ही दुर्दैवी घटना घड़ली तेव्हा सर्व खेळाडू बसमध्येच होते. मात्र सुदैवाने, कोणताही मोठा अपघात झाला नाही आणि खेळाडू व सपोर्ट स्टाफला वेळेवर वाचवण्यात यश आलं.
बसमध्ये अचानक पसरला धूर
पीटीआयच्या रिपोर्टनुसार, आयपीएल फायनलनंतर गुजरातच्या संघाचे सर्व खेळाडू बसमधून हॉटेलच्या दिशेने जात होते, तेव्हाच बसमध्ये अचानक काही बिघाड झाला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि बसच्या आत धूर पसरू लागला. यावेळी गुजरातचा कर्णधार शुबमन गिल, बटलर तसेतच संघातील खेळाडू आतमध्येच होते. बिगडलेली परिस्थिती पाहून, संघ व्यवस्थापन आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना तत्काळ बसमधून सुरक्षितपणे बाहेर काढलं. सुदैवाने, या घटनेत कोणताही खेळाडू किंवा कर्मचारी जखमी झाला नाही. या घटनेनंतर संपूर्ण संघ काही वेळ रस्त्याच्या कडेला थांबला होता. नंतर, खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना हॉटेलपर्यंत पोहोचवण्यासाठी दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यात आली.
आयपीएल फायनलमध्ये गुजरातचा पराभव
आयपीएलच्या अंतिम सामन्यात झालेल्या परभावामुळे गुजरात टायटन्सचा संघ आधीच निराश असताना, काल दिवसाअखेरीस ही घटना घडली. रविवारी आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) विरुद्ध पाच गुजरातचा 5 विकेट्सनी पराभव झाला. या पराभवाने गुजरातच्या विजेतेपद जिंकण्याच्या आशा धुळीस मिळवल्या.
अंतिम सामन्यापूर्वीही गुजरात टायटन्सचे प्रवासाचे वेळापत्रक व्यस्त आणि आव्हानात्मक होतं. हा संघ 27 मे रोजी धरमशाला येथून मुल्लानपूरला गेला, जिथे 29 मे रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध दुसरा क्वालिफायर सामना खेळला गेला. मुल्लानपूरमधील त्यानंतर ते 30 मे रोजी अहमदाबादला परतणार होते, परंतु मुल्लानपूरमधील खराब हवामानामुळे संघाच्या विमानाला उशीर झाला. वारंवार झालेल्या विलंबानंतर, गुजरात टायटन्स संघ अखेर शनिवारी संध्याकाळी उशिरा त्यांच्या घरच्या मैदानावर, अहमदाबाद येथे पोहोचला.
त्यानंतर अंतिम सामन्यातील पराभव आणि हॉटेलवर परत येताना संघाच्या बसमधील तांत्रिक बिघाडामुळे गुजरात टायटन्सच्या प्रदीर्घ आणि खडतर मोहिमेचा निराशाजनक शेवट झाला. मात्र, सर्वात दिलासादायक बाब ही होती की, बसमध्ये धूर पसरूनही कोणालाही दुखापत वा त्रास झाला नाही, आणि सर्व खेळाडू तसेच कर्मचारी सुरक्षित राहिले.
