IPL 2025 नंतर आणखी एक स्पर्धा स्थगित, ऑलम्पिक स्टार नीरज च्रोपा याला झटका
India Pakistan Attack Neera Chopra Classic Tournament Postpond : भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. आयपीएल आणि पीएसएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेलाय. त्यानंतर आता नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धाही स्थगित करण्यात आली आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आता शिगेला पोहचला आहे. पाकिस्तानला ठेचल्यानंतरही त्यांच्या कुरापती सुरुच आहेत. दुसऱ्या देशांकडून कर्ज मागण्याची वेळ ओढावलेली असतानाही पाकिस्तान धजावत नाहीय. पाकिस्तान भारतावर हल्ले करण्याचे प्रयत्न करत आहे. पाकिस्तानकडून वारंवार नागरी वस्त्यांवर हल्ला केला जात आहे. या साऱ्या स्थितीचा परिणाम हा दोन्ही देशातील क्रीडा वर्तुळावरही झालेला पाहायला मिळत आहे. आयपीएल आणि पीएसएल या दोन्ही स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. आयपीएल 2025 आठवड्याभरासाठी स्थगित करण्यात आला आहे. अशात आता भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा यालाही भारत-पाकिस्तान तणावाचा फटका बसला आहे.
बंगळुरुत येत्या 24 मे रोजी ‘नीरज चोप्रा क्लासिक’ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र युद्धभूमीवर सुरु असलेल्या कारवायांमुळे नाईलाजाने ही स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. नीरज चोप्रासह या स्पर्धेत अनेक आंतरराष्ट्रीय भालाफेकपटू सहभागी होणार होते. मात्र खेळाडूंच्या सुरक्षितता हे आमचं प्राधान्य आहे. त्यामुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात येत असल्याची माहिती आयोजकांकडून सोशल मीडियावरुन देण्यात आली. तसेच भारतीय सैन्याला आमचा संपूर्ण पाठींबा आहे. लवकरच या स्पर्धेसाठी पुढील तारीख जाहीर करण्यात येईल, असंही आयोजकांकडून सांगण्यात आलं आहे.
नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धेचं आयोजन हे फक्त एक दिवसच करण्यात आलं होतं. या स्पर्धेत 2 वेळा विश्वविजेता असणारा ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स, जर्मनीचा ऑलिम्पिक पदकविजेता थॉमस रोलर, यूलियस येगो आणि अनेक दिग्गज भालाफेकपटू स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
आणखी एक स्पर्धा स्थगित
STATEMENT. pic.twitter.com/S6EdZ87ITh
— Neeraj Chopra Classic (@nc_classic) May 9, 2025
अर्शद नदीमला आमंत्रण, नीरज चोप्रा ट्रोल
नीरच चोप्राने या स्पर्धेसाठी ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदकविजेत्या अर्शद नदीम यालाही निमंत्रित केलं होतं. मात्र अर्शद नदीम याने आगामी आशियाई एथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेमुळे नकार दिला. अर्शदला निमंत्रित केल्याने नीरज चोप्रा याला ट्रोल करण्यात आलं होतं.
दरम्यान जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 26 पर्यटकांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला होता. भारताने या दहशतवादी हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे चोख उत्तर दिलं. तेव्हापासून दोन्ही बाजूने यूद्धभूमीवर संघर्ष पाहायला मिळत आहे. मात्र भारताने पाकिस्तानचे अनेक हल्ले परतवून लावत चोख उत्तर दिलं आहे.