अहमदनगर : अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील समनापूर गावात 2 गटात वाद झाल्याचे काल समोर आले. दोन गटातील वाद झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आहे. आता परिसरात शांतता आहे. संबंधित घटना ही संगमनेर तालुक्यापासून 5 ते 6 किमी अंतरावर असलेल्या समनापूर गावात घडली. या वादादरम्यान काही गाड्यांच्या काचाही फोडण्यात आल्या आहेत. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन जण जखमी झाल्याची देखील माहिती मिळत आहे. या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील समनापूर गावात 2 गटात झालेल्या वाद आणि दगडफेक प्रकरणी पोलिसांनी 16 जणांना अटक केली आहे. सध्या समनापूर या गावात तणावपूर्ण शातंता दिसत आहे. तर या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. इतर हल्लाखोरांचा शोध सध्या सुरू आहे.