हार्दिक पटेल यांनी काँग्रेसच्या पदाचा आणि सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ऐन गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच हार्दिक पटेल यांनी राजीनामा दिल्याने गुजरात काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हार्दिक पटेल यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना अत्यंत खरमरीत पत्रं लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी काँग्रेसच्या राज्य नेतृत्वावर टीका केली आहे. तसेच गुजरात, गुजराती माणसाचा अपमान, गुजरातच्या समस्या आणि गुजरातींकडे बघण्याचा काँग्रेसचा दृष्टीकोण यावरून त्यांनी काँग्रेसला घेरलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पटेल यांनी गुजराती अस्मितेचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पटेल यांनी या पत्रातून जाता जाता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली आहे.