मुंबई, ३० सप्टेंबर २०२३ | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यावर बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. जनतेच्या पैशावर मंत्री परदेशात सहल करतात, अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. या टीकेला प्रत्युत्तर देत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आदू बाळा… असा उल्लेख करत आदित्य ठाकरे यांना चांगलंच फटकारलं होतं. याच टीकेवर पुन्हा आदित्य टाकरे यांच्याकडून पलटवार करण्यात आला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, याच एका आदू बाळाने यांना केवढं सळो की पळो केलं हे दिसून येत आहे. देशात एक पप्पू नाव ठेवलेलं त्यांने यांना हलवून सोडलं आहे. माझ्या नावात बाळ लावलं याचा मला अभिमान आहे, कारण माझ्या आजोबांचं नाव देखील बाळच होतं. ते रक्तात आहे. तर त्यांच्या भाषेतून त्यांचे नैराश्य स्पष्टपणे दिसत आहे. त्यांचे विचार किती खालच्या पातळीचे आहेत, हे दिसून येते, असा पलटवार आदित्य ठाकरे यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. ही नव्या भाजपची भाषा आहे काय, हा चेहरा नव्या भाजपचा आहे काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.