‘अजितदादांना अटक करा अन् देवेंद्र फडणवीसांचा कान…’, अभिजीत बिचुकले यांचं थेट मोदींना पत्र

Harshada Shinkar | Updated on: Nov 04, 2024 | 2:28 PM

अभिजीत बिचुकले यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. मागील निवडणुकीच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत टीका केली होती. मात्र आता सत्तेत आल्यानंतर अजित पवार यांना अर्थ खाते देण्यात आले आहे. यासंदर्भात अभिजीत बिचुकले यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात अजित पवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सिंचन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अटक करा, अशी मागणी अभिजीत बिचुकले यांनी केली आहे. अभिजीत बिचुकले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासंदर्भात एक पत्र लिहिले आहे. कारवाई करा अन्यथा अजित पवारांची माफी मागा, अशी मागणी अभिजीत बिचुकले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. ‘तुम्ही सज्जन पंतप्रधान जर असाल तर अजित पवार यांच्यावर कठोर कारवाई करा. जोपर्यंत मी विधानसभेचा उमेदवार आहे आणि माझं निवडणुकीचं चिन्ह घोषित व्हायच्या आत ही कारवाई करा. अजित पवार यांच्यावर कारवाई करायची नसेल तर देवेंद्र फडणवीस यांचा कान धरा आणि अजित पावरांसह राज्यातील जनतेची माफी मागायला लावा.’, असं मोदींना लिहिलेल्या पत्रात अभिजीत बिचुकलेंनी म्हटले आहे. तर अजित पवारांना सिंचन घोटाळा प्रकरणी ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला, असा आरोप १९९१ सालापासून विधानभवनात असलेल्या अजित पवारांवर केला जातो, आता सत्तेत आल्यानंतर अजित पवार यांना अर्थ खाते देण्यात आले आहे. यासह त्यांना अर्थमंत्री पद दिलं जातं. त्यामुळे ही जनतेच्या मतांची कुचेष्ठा नाही का? असा सवालच अभिजीत बिचुकले यांनी केलाय.

Published on: Nov 04, 2024 2:24 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us