नांदेड: नांदेडमधील बड्या नेत्यावर ईडीची कारवाई होण्याचे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. पाटील यांचा संपूर्ण रोख काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याकडे असल्याची जोरदार चर्चा होती. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा तर निवडणूक पाहून खळबळ माजवण्याचा प्रयत्न आहे, असं सांगत अशोक चव्हाण यांनी चंद्रकांतदादांच्या विधानाची खिल्लीच उडवली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर अशोक चव्हाण यांची मीडियाने प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी हे विधान केलं. चंद्रकांत पाटील यांना इतकी माहिती मिळते कुठून? असा सवाल करत लोकशाहीत असे अपेक्षित नसल्याची खंत चव्हाण यांनी केली. निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन खळबळ माजवण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावाही चव्हाण यांनी केला आहे. मात्र, यावर फारस भाष्य करणार नाही असे म्हणत हे सगळं राजकीय असल्याचे ते म्हणाले आहेत.