अकोला : अकोला जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या पाण्यामुळे पूर्णा नदीकाठच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान (Crop damaged) झाले आहे. शेतकऱ्यांना खरीप पिके काढणेही शक्य नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना त्वरित शासनाने मदत निधी जाहीर करावा आणि पूर्ण नुकसानग्रस्त शेतीचे त्वरित पंचनामे करावे असे निर्देश आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी तलाठी आणि कृषी सहाय्यक यांना दिले आहेत. किंखेड पूर्णा येथील शेतीची पाहणी करताना ते बोलत होते. यात आता पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. जिल्ह्याला पालकमंत्री नाहीत. महाराष्ट्राला मंत्री नाही. शेतकरी (Farmers) संकटात असताना मंत्री पर्यटन करत आहेत. मात्र शेतकऱ्यांसाठी यांच्याकडे पैसा नाही. थोडी लाज शिल्लक असेल, तर मदत द्यावी, अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे.