अहमदनगर : मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आता भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांच्या नजरा विस्ताराकडे लागल्या आहेत. नेमके कोण मंत्री होऊ शकतात, याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. जर अनेक आमदारांनी आपल्याला मंत्रीपद मिळेल असं बोलून दाखवलं आहे. यात शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी आपण रायगडचे पालकमंत्री होऊ असा दावा केला आहे. याचदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असे सांगितलं आहे. त्यामुळे आता अहमदनगरच्या वाट्याला कॅबिनेट येणार की राज्यमंत्री पद? कोण होणार मंत्री? कोण ठरणार जिल्ह्याच्या राजकारणात बाजीगर? असे प्रश्न आता भाजपमधील कार्यकर्ते एकमेंकाना विचारताना दिसत आहेत. तर सध्याच्या घडीला आमदार मोनिका राजळे यांचं मंत्री पदासाठी नाव चर्चेत आहे. तर राजळे यांना राज्यमंत्री पदी संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरून मंत्री पदाची संधी मिळाली तर आणि नाही मिळाली तरी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे राजळे यांनी म्हटलं आहे.