मुंबई : कोल्हापूर आणि अहमदनगर येथे झालेल्या घटनेवरून राज्यातलं वातावरण चांगलं तापलं आहे. अहमदनगरमध्ये उरुसनिमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणूकीत काही तरुणांनी औरंगजेबाचा फोटो झळकावला होता. तसेच कोल्हापुरात औरंग्याचे स्टेट्स टाकण्याचा प्रकार घडला. यामुळे गुरुवारी कोल्हापुरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या संपूर्ण प्रकाराच्या निषेधार्थ दादर येथील शिवाजी पार्कात मनसेने बुधवारी आंदोलन केले. यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात मनसे कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्क येथे औरंगजेबाचा पुतळा जाळला. आता याप्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर जमाव जमवून पुतळा जाळल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर मुंबई पोलीस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.