मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सर्वच जण फिरण्यासाठी बाहेर जात असतात. मात्र मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मनसोक्त फिरण्याचा प्लान करा. कारण मध्य रेल्वे प्रशासनाने उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त पाच उन्हाळी विशेष गाड्यांच्या १०० फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. पुणे- सावंतवाडीदरम्यान २० फेऱ्या, पनवेल- करमळी १८, पनवेल-सावंतवाडी २०, लोकमान्य टिळक टर्मिनस- कन्याकुमारी १८, पुणे जंक्शन अजनी २२ विशेष फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये घुमो, फिरो जमके असंच वातावरण पाहायला मिळणार आहे.