मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथे 29 मार्चला मध्यरात्री किराडपुरा भागात तणाव निर्माण झाला. दोन गटात हा राडा झाला. तर तैनात पोलिसांची वाहने जाळण्यात आली. येथील वातावरण शांत होते ना होते तोच आता मुंबईच्या मालवणी परिसरात दोन गटात राडा झाला. मिरवणुकीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यानंतर तेथील परिस्थिती आटोक्यात आली आहे.
मुंबईच्या मालवणी परिसरात रामनवमीनिमित्त शोभायात्रा आणि धार्मिक उत्सावाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, मुंबईच्या मालवणी परिसरातील गेट नंबर पाच परिसरात मिरवणुकीदरम्यान दोन गटात बाचाबाची झाली. त्याचे रूपांतर राड्यात झाले. तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. सध्या तणावपूर्ण शांतता आहे.