नांदेड : आपल्याकडे एक काही मिनीटं लाईट गेली की किती त्रास होतो. त्यातच जर पुर्ण दिवस लाईट गेली तर काही बोलून नका? पण जर एखाद्या गावात तब्बल महिनाभर लाईटच नसेल तर? अन् तेही वांरवार तक्रार करून देखील तर काय म्हणाल? महावितरणची उदासिनता, कानाडोळा की गलथान कारभाराचा कळस? असाच कारभार महावितरणकडून पळसगांव-टाकळगांव (ता. नायगांव) या गावच्या गट ग्रामपंचायत बाबतीत सुरू आहे. येथे रोहित्र नादुरुस्त असल्यामुळे नागरिकांना महिनाभरापासून अंधारात रहावे लागत आहे. तर विद्युत पुरवठ्या अभावी गावकऱ्यांची अनेक कामे खोळंबत आहेत. त्यामुळे रोहित्र त्वरित बसवून पळसगांव-टाकळगांव अंधार दूर करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. तसेच रोहित्र त्वरित बसवून नाही झाल्यास गावकऱ्यानी महावितरणच्या विरोधात आंदोलन उभारण्याचा इशारा दिलाय.