“रावसाहेब दानवेंना शब्द देतो, तुम्ही मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी पुढाकार घ्या, आम्ही खंबीर पाठीशी राहतो” असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिलं. मुख्यमंत्री महोदय पाठीशी उभे रहा, पुढचं मी बघतो, असं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) म्हणाले होते. “मराठवाड्यात आपण आपआपसात भांडत कशाला बसायचं? नालायकपणे कारभार करुन आपणही भांडत राहिलो तर फरक काय राहिला. अपेक्षेशिवाय आयुष्य असू शकत नाही, तुम्ही आमच्याकडे आणि आम्ही तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करायच्या” असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास त्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्मांना राज्यातील जनतेच्या वतीने अभिवादन केलं. यानंतर केलेल्या भाषणात त्यांनी मराठवाड्यासाठी मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये मराठवाड्यासाठी संतपीठाची घोषणा तसंच निजामकालीन 150 शाळांचा पुनर्विकास करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
– मराठवाड्यासाठी संतपीठ व्हावं
– निजामकालीन 150 शाळांचा पुनर्विकास करणार
– औरंगाबाद आणि अहमदनगर रेल्वेने जोडण्याचं रेल्वे राज्यमंत्र्यांना आवाहन
– औरंगाबाद आणि शिर्डी विमानसेवा सुरु करण्याची संकल्पना
– मराठवाड्यासाठी 200 मेगावॅट सौरउर्जा प्रकल्प उभारणार
– घृष्णेश्वर सभामंडप उभारणार
– औरंगाबादला पर्यटन समृद्ध
– परभणीत शासकीय महाविद्यालय