मुंबई: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी, “नातं जपण्यासाठी शिवसेना आणि मातोश्री प्रसिद्ध आहे. काही लोकं केवळ राजकारण करतात. आम्ही मात्र राजकारणाच्या पलिकडे जाऊन नातं जपत असतो”, अशी प्रतिक्रिया दिली. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. ठाकरे कोणतं नातं जपतात माहित नाही. पाच वर्ष ते ज्यांच्यासोबत होते, त्यांचा फोन सुद्धा उचलायचा नाही, त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद केले.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा विरोध केला त्यांना मातोश्रीमध्ये बोलवून बटाटेवडे खाऊ घालायचे, हे कुठलं नातं?, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.