एकाच पक्षाच्या नेत्यांना ‘दिलासा’ कसा मिळतोय, असा सवाल करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज 14 एप्रिल रोजी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी पुन्हा एकदा न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आयएनएस विक्रांत प्रकरणी किरीट सोमय्यांना मिळालेल्या जामिनावर त्यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. घोटाळा 58 रुपयांचा असो की 58 कोटींचा असो. गुन्हा हा गुन्हाच असतो. सोमय्यांना न्यायालयाने अजून निरपराध ठरवले नाही. मात्र, महाराष्ट्रात एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना न्यायालयात दिलासा कसा मिळतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिवाय महाविकास आघाडीच्या लोकांना असा दिलासा का मिळत नाही. न्यायव्यवस्थेत एका पक्षाच्या विचारांची लोक आहेत, त्यामुळे असे सुरू असल्याचा आरोप राऊत यांनी केला.