मुंबई : माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची स्नूषा डॉ.अर्चना पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे कॉंग्रेसला मानणारे आणखी एक कुटुंबाची नवी पिढी भाजपात सामील झाली आहे. त्यामुळे कॉंग्रेसला हा मोठा फटका मानला जात आहे. भाजपाचा आता लातूरमध्ये किल्ला मजबूत झाल्याचे म्हटले जात आहे. आपण समाजकारणात आधीपासूनच होतो. परंतू राजकारणातला हा माझा पहिलाच प्रवेश असल्याने आपण एका राजकीय पार्टीतून दुसऱ्या राजकीय पार्टीत आलेलो नसल्याचे अर्चना पाटील यांनी नमूद केले आहे. आपण पंतप्रधानांचा गेल्या दहा वर्षांचा प्रवास पाहीला. विकसनशील ते विकसित भारताचा प्रवास आपण अनुभवत आहोत. मोदींनी नवीन संसद उभारल्यानंतर पहिलेच नारी शक्ती वंदन हे विधेयक आणून महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण दिल्याने त्यांच्या निर्णयाने प्रेरित होऊन राजकारणात प्रवेश केल्याचे अर्चना पाटील यांनी म्हटले आहे.