मुंबई : राजापुरातील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्यासह कोकणात अलिकडच्या काळात ज्यांच्या हत्या झाल्या. त्याची केंद्र सरकारने स्पेशल टीम मार्फत चौकशी करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली. राऊतांसह काही नेत्यांनी या हत्येची चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर शशिकांत वारिसे यांच्या हत्येवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्येची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन देत हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात नेण्याचा प्रयत्न करू असेही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. तर हे प्रकरण गंभीर असून ही हत्याकरण्यामागे कोणाचा हात आहे? हत्या करणाऱ्यांचा नेमका हेतू काय आहे? याची सखोल चौकशी करू, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.