नवी दिल्लीः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्याची दुर्दशा झाली आहे. म्हणून मी हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावला. पण ठाकरे सरकारने आमच्याविरोधात राजद्रोहाचं कलम लावलं. हे इंग्रजांच्या काळातील कलम आहे. हे सरकार इंग्रजांच्या काळातील कायदे पाळतं हे महाराष्ट्राचंच दुर्दैव आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pande) यांनीही मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी आमच्याविरोधात हे कलम लावल्याचा आरोप रवी राणा यांनी केला. दिल्लीत आज रवी राणा यांनी पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्रात तुरुंगात असताना आपल्याला वाईट वर्तणूक मिळाल्याची तक्रार करण्यासाठी रवी राणा आणि नवनीत राणा दिल्लीत गेले आहेत. दरम्यान, सुप्रीम कोर्टानं राणा दाम्पत्याविरोधात जे राजद्रोहाचं कलम लावलं आहे, त्यावरच तात्पुरती स्थगिती आणली आहे. त्यानुसार केंद्र किंवा कोणतंही राज्य सरकार या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करू शकत नाही किंवा त्यानुसार कारवाई करू शकत नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारला इशारा देताना रवी राणा यांनी वरील वक्तव्य केलं.