मुंबई : बारामतीवरुन राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांना(Sharad Pawar) टार्गेट करणाऱ्यांना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांचे(Jitendra Awhad ) जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 1995 सालानंतर शरद पवार साहेबांचे नाव घेतल्याशिवाय आपल्याला राजकारण करता येणार नाही असे विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांना उबगलं आणि मग त्यानंतर सातत्याने खोटेनाटे आरोप जे कधी सत्यात उतरले नाहीत. ते बेलगाम आणि बेफामपणे करण्यात आले. त्याचा महाराष्ट्राच्या जनतेवर कुठलाच परिणाम झाला नाही. आजही काहीजण परत एकदा शरद पवार साहेब आणि बारामती यांच्याबद्दल बोलतायेत. गड उध्वस्त करू म्हणून वल्गना करताहेत, विसर्जन करू म्हणता आहेत अर्थात ते केवळ आपण आणि आपला पक्ष चर्चेत रहावा म्हणून हे दावे केले जात असल्याचे आव्हाड म्हणाले. बारामतीचा गड जिंकून दे असं साकडं बारामतीच्या मारूतीच्या देवळात जाऊन कुणीतरी घातलं. 60 वर्षे प्रत्येक निवडणूकीचा फॉर्म शरद पवार साहेब ह्याच मारूतीच्या समोर उभे राहून नंतर दाखल करतात. आज तो मारुती देवळाच्या बाहेर येऊन हसत हसत विचारत होता. हे आत्ता आलेले ते कोण होते ? बावन कुळे सोडा लाख कुळे आली तरी नखा वरची धूळ पण उडणार नाही. नपवार साहेब हे राजकारणाचे केंद्राबिंदू आहेत. बावनकुळे, लाख कुळे जी उद्धारली ती पवार साहेबांमुळेच असेही आव्हाड म्हणाले.