JP Nadda | नीट आंदोलनाला मोठं यश; जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि परीक्षा सुधारणांवरही सकारात्मक निर्णय
नीट पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आंदोलनकर्त्यांचे प्रतिनिधी सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्यासोबत तिसऱ्या फेरीची बैठक पार पडली असून, या बैठकीत विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.
नीट पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आंदोलनकर्त्यांचे प्रतिनिधी सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्यासोबत तिसऱ्या फेरीची बैठक पार पडली असून, या बैठकीत विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.
जेपी नड्डा म्हणाले की, आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्या लेखी स्वरूपात सरकारसमोर मांडल्या. त्यामध्ये आंदोलकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत माहिती देण्यात आली होती. तसेच, दिल्ली आणि भाजपशासित राज्यांमध्ये आंदोलकांविरोधात दाखल करण्यात आलेले सर्व एफआयआर मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती. सरकारने ही मागणी मान्य केली असून, भविष्यातही या आंदोलनाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीवर गुन्हे दाखल केले जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याच्या मागणीवरही सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याचं नड्डा यांनी सांगितलं. अशा कुटुंबांबद्दल सरकारला पूर्ण सहानुभूती असून, नियमानुसार शक्य तितकी जास्त नुकसानभरपाई देण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
याशिवाय, आंदोलनकर्त्यांनी सादर केलेल्या फाईव्ह पॉइंट चार्टरवरही सरकार गंभीरपणे विचार करणार असल्याचं नड्डा यांनी सांगितलं. विशेषतः परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासंदर्भातील सूचनांचा अभ्यास केला जाईल. आंदोलनकर्त्यांशी पुढील चर्चेनंतर विद्यार्थ्यांच्या हिताचा आणि शिक्षण व्यवस्थेला बळकटी देणारा योग्य निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
