Special Report | न्यायमूर्ती उदय लळीत होणार नवे सरन्यायाधीश

| Updated on: Aug 04, 2022 | 11:50 PM

न्यायमूर्ती लळीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्याचे सुपुत्र आहेत. गिर्ये कोठारवाडी गावात त्यांचं मूळ घर आहे. उदय लळीत यांचे आजोबा आणि वडील दोघेही वकील होते. उदय लळीत यांचे आजोबा वकिलीसाठी सोलापूरला गेले आणि त्यानंतर लळीत कुटुंब तिथेच स्थायिक झालं.

Follow us on

मुंबई : गेल्या दीड महिन्यांपासून शिवसेना विरुद्ध शिंदे गटाचा संघर्ष सुरु आहे. शिवसेना कुणाची? आणि आमदारांच्या निलंबनाबाबत काय होणार? हे मुद्दे आता सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. हे प्रकरण आता घटनापीठाकडे जाण्याची शक्यता आहे. प्रकरण घटनापीठाकडे गेल्यास यावर निर्णय येण्यास काही काळ जाऊ शकतो. आणि असं झालं तर या घटनात्मक पेचावर एका मराठी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली असलेलं घटनापीठ निर्णय देऊ शकतं. कारण य़ेत्या 26 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश(Chief Justice) एन व्ही रमण्णा निवृत्त होणार आहेत.  त्यांच्या जागी मराठी असलेल्या उदय उमेश लळीत(Justice Uday Lalit) यांची वर्णी लागणार आहे.

न्यायमूर्ती लळीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्याचे सुपुत्र आहेत. गिर्ये कोठारवाडी गावात त्यांचं मूळ घर आहे. उदय लळीत यांचे आजोबा आणि वडील दोघेही वकील होते. उदय लळीत यांचे आजोबा वकिलीसाठी सोलापूरला गेले आणि त्यानंतर लळीत कुटुंब तिथेच स्थायिक झालं.

उदय लळीत यांचं शिक्षण मुंबई विद्यापीठातून झालं. 1983 मध्ये त्यांनी वकिली क्षेत्राला सुरुवात केली. 1985 च्या अखेरीपर्यंत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली. जानेवारी 1986 मध्ये त्यांनी दिल्ली हायकोर्टात प्रॅक्टिसला सुरुवात केली. एप्रिल 2004 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केलं. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया लीगल सर्व्हिसेस कमिटीचे ते सदस्य देखील होते. सध्याचे सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा यांनी उदय लळीत यांच्या नावाची शिफारस केलीय.

येत्या 27 ऑगस्टला उदय लळीत सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत. लळीत यांनी देशभरातल्या अनेक महत्वाच्या खटल्यांमध्ये आपल्या वकिलीचा ठसा उमटवलाय. 7 वर्षे त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पॅनेलवर काम केलंय. देशातील 14 राज्यांच्या वतीनं त्यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रकरणं चालवली आहेत. टू जी स्पेक्ट्रम घोटाळा खटल्याप्रकरणी सीबीआय आणि ईडीच्या वतीनं त्यांनी अभियोगाची जबाबदारी सांभाळली होती. 80 हजार पानांचा डोलारा सांभाळत त्यांनी टू जी स्पेक्ट्रम घोटाळा चालवला होता.

पुढच्या 4 महिन्यात देशाला 3 सरन्यायाधीश मिळणार आहेत. न्यायमूर्ती उदय लळीत यांच्यानंतर सरन्यायाधीशपदाची जबाबदारी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड़ यांच्यावर येणार आहे. जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत हे दोघेही निवृत्त होणार आहेत. याआधी सरन्यायाधीशपदाची जबाबदारी सांभाळलेले न्य़ायमूर्ती शरद बोबडे हेसुद्धा मराठी होते. आता देशाला आणखी एक मराठी सरन्य़ाय़ाधीश मिळणार आहेत. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या घटनात्मक पेचावर कदाचित न्यायमूर्ती उदळ लळित यांच्याच अध्यक्षतेखालील घटनापीठ निर्णय देण्याची शक्यता आहे.