औरंगाबादः औरंगाबाद जिल्ह्यातील खुल्ताबाद (Khultabad) येथील मुघल बादशहा औरंगजेबाची कबर (Aurangzeb Tomb) पाच दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय पुरात्त्व विभागाने (Department of Archeology) घेतला आहे. एमआयएमचे तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी 12 मे रोजी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यानंतर महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यामुळे कबर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. स्थानिक नागरिकांनी तर दोन दिवसांपूर्वीच स्वतःहून कबर बंद करण्याचा आग्रह धरला होता. कबरीला काही अज्ञातांकडून धोका असल्याचं स्थानिकांचं म्हणणं होतं. मात्र त्याच वेळी पोलिसांनी हस्तक्षेप केला. परिसरातील वातावरण शांत केलं. तेव्हापासून खुलताबाद परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. आता अखेर पुरातत्व विभागाने ही कबर पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबादमध्ये येणाऱ्या पर्यटकांना ही कबर पहता येणार नाही, असे विभागातील अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.