राज ठाकरे यांच्या अल्टीमेटम नंतर पोलीस प्रशासनाने सर्वच धार्मिक स्थळांना नोटीस दिल्या आहेत. याचा फटका शिर्डीच्या साई मंदिराला देखील बसला आहे. साईबाबांची पहाटे 5 वाजून 15 मिनिटांनी काकड आरती आणि रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी होणारी शेजारती आता स्पीकरविनाच होणार आहे. सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत साईबाबा संस्थानला जिल्हा पोलिस प्रशासनाने स्पीकर लावण्याकरीता परवानगी दिली आहे. त्यामुळे दोन आरतीचा स्वर बंद झाला आहे. स्पीकरविना होणाऱ्या आरतीमुळे भक्तांमध्ये नाराजी पसरली आहे. आज पहाटे झालेल्या काकड आरतीवेळी आवाज येत नसल्याने भाविकांमध्ये कमालीचा संभ्रम पहायला मिळाला.