आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारनं जारी केलेल्या निर्बंधांबाबत सविस्तर भूमिका मांडली. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येसोबत ओमिक्रॉनच्या धोक्यामुळे सरकारनं खबरदारी घेत निर्बंध जारी केले असल्याचं त्यांनी म्हटलंय. या निर्बंधांचा कुणीही गैरअर्थ काढू नये, असंही राजेश टोपे यांनी म्हटलंय. दरम्यान, तिसरी लाट जर आली तर ती ओमिक्रॉनचीच असेल असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय.
फ्रान्स, ब्रिटनमध्ये ज्या प्रमाणे कोरोना रुग्णवाढीचा वेग पाहायला मिळत आहे, त्यानुसार आताच जर आपण महाराष्ट्रात खबरदारी घेतली नाही, तर रुग्णवाढीचा दर आणखी वाढण्याची भीती असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. गर्दी रोखण्यासाठीच निर्बंध जारी केले असल्याचं राजेश टोपे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं आहे. वर्षाअखेरीस होणाऱ्या पार्ट्या, त्याचप्रमाणे उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊन ओमिक्रॉनचे रुग्ण वाढू नये, यासाठी रात्रीच्या वेळीत जमावबंदीसारखा निर्णय घेत असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलंय. याचं पालन केलं गेलं नाही, तर तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचंही यावेळी आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं.